Saturday, May 31, 2025

ताज्या घडामोडीविडिओ

'अग्निवीर’ राष्ट्रासाठी जळणारे अनसंग हिरो!

'अग्निवीर’ राष्ट्रासाठी जळणारे अनसंग हिरो!

आपण पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करणा-या ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलतो, आपण त्या क्षणांचा अभिमानही बाळगतो. ज्या क्षणी भारताने शत्रूच्या छाताडावर आपली ताकद, बुद्धी आणि योजना यांचं तेज दाखवलं... पण यात एक गोष्ट आहे जी कुणीही बोलत नाहीये.. ती गोष्ट म्हणजे – ‘अग्निवीर’.


ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. पण याच्या मागे जे हात होते, ज्या डोळ्यांनी शत्रूला टिपलं, ते होते आपले अग्निवीर. वय फक्त वीस. पण धाडस असं की, शत्रूने थरथर कापावं. ते केवळ बंदुका चालवत नव्हते... ते आधुनिक क्षेपणास्त्र, रडार, आणि हाय-टेक संरक्षण प्रणालींवर हात फिरवत होते जणू काही व्हिडीओ गेमच खेळतायत.


पाकिस्ताननं ड्रोन पाठवले, मोर्टार डागले, क्षेपणास्त्रं झाडली. पण आपल्या अग्निवीरांनी ३ हजार ३२३ किलोमीटर सीमाभाग अखंड ठेवला. एकही स्फोट, एकही चूक – नाही. भारताची ढाल म्हणावी अशी ही यंत्रणा... आणि तिचा आत्मा होते अग्निवीर.


काही लोक म्हणाले होते.. "ही अग्निपथ योजना फसवी आहे, या तरुणांवर एवढी जबाबदारी देणं धोकादायक आहे." पण आज इतिहास साक्ष देतोय, या तरुणांनीच पाकिस्तानला झणझणीत प्रत्युत्तर दिलं.


सरगोधा, मालीर, नूरखान – पाकिस्तानच्या या मोठ्या लष्करी छावण्यांना भारतानं एका पाठोपाठ एक उद्ध्वस्त केलं... आणि यामध्ये हात होता अग्निवीरांचा. ते फक्त सैनिक नाहीत, ते डिजिटल योद्धे आहेत. त्यांच्या बोटांमध्ये फक्त ट्रिगर नव्हता, तर रडार स्कॅनिंग, अग्नि नियंत्रण प्रणाली, आणि संवाद सिग्नलचं नेटवर्क होतं. त्यांनी चालवली.. L-70, Pechora, Akash, Shilka, Osa – हाय-टेक डिफेन्स सिस्टीम्स.


कोण म्हणतं की हे ‘नवे’ आहेत? हे तर 'नव्या भारताचे नवे अर्जुन' आहेत. फरक इतकाच.. यांच्याकडे धनुष्य नाही, क्षेपणास्त्रं आहेत. सारथीही आहे.. देशभक्ती.


आज इस्रायलचा Iron Dome ४० किलोमीटरमध्ये मर्यादित आहे, पण भारताच्या अग्निवीरांनी काश्मीरपासून कराचीपर्यंतचा शत्रू अडवला. GPS जॅमिंग असो, ड्रोन हल्ला असो.. हे सगळं प्रत्यक्षात करून दाखवलं आपल्या जवानांनी.



ऑपरेशन सिंदूर हा केवळ पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव नव्हता. हा त्यांचा ठेचलेला अहंकार होता, ज्यांनी अग्निपथ योजनेची खिल्ली उडवली. हे प्रत्युत्तर होतं, टीका करणाऱ्यांना, शंका घेणाऱ्यांना, देशाच्या नव्या पिढीवर विश्वास नसणाऱ्यांना. भारत बदलतो आहे. आता लढाई फक्त रणांगणावर नाही, ती संगणकावर, स्क्रीनवर आणि सेन्सरवर लढली जाते. आणि त्या रणांगणावर आपले अग्निवीर... पहिल्या रांगेत आहेत. त्यांना सलाम करणं पुरेसं नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवणं, ही आपली जबाबदारी आहे.


कारण ही फक्त गोष्ट नाही... ही त्या 'गोष्टीतल्या वीरांची' खरी कहाणी आहे... जी अजूनही अनेकांना ऐकू आलीच नाही... या मुलांनी दाखवून दिलं आहे की, देशप्रेम वय पाहून येत नाही, ते मनातून येतं... आणि ते मन जितकं धाडसी, तितकंच भारताचं भवितव्य उज्वल. अग्निवीर म्हणजे भारताचा आत्मविश्वास. अग्निवीर म्हणजे भारताची नवशक्ती. अग्निवीर म्हणजे आमच्या छातीवरचा अभिमानाचा पदक. आज आपण त्यांच्या शौर्याला, त्यागाला, आणि क्षमतेला केवळ वंदन करू शकतो. त्यांच्यासाठी हात जोडून, मस्तक झुकवून एवढंच म्हणूया... "जय जवान! जय अग्निवीर!जय हिंद!"

Comments
Add Comment