
पुणे: वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Case) प्रकरणानंतर महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar Resignation) यांच्यावर राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांनी अखेर यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
त्या म्हणाल्या, “राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच असते. पंतप्रधान मोदींपासून गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा मागितला जातो”. त्या नाशिकमध्ये ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत जनसुनावणीसाठी उपस्थित होत्या. त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
"कुटुंब एकत्र ठेवणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे"
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “कोणत्याही कुटुंबातून आलेल्या तक्रारीकडे आम्ही सामोपचाराने पाहतो. कुटुंब एकत्र ठेवणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. गैरसमज दूर करून संवाद साधणं आणि कायद्यानुसार तीन वेळा काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं.” त्या पुढे म्हणाल्या की, “कुटुंबव्यवस्था टिकवणं हेच आमचं काम आहे; तोडणं नव्हे, जोडणं गरजेचं आहे.”
परिणय फुके प्रकरणावर स्पष्टीकरण
परिणय फुके प्रकरणासंदर्भात चाकणकर म्हणाल्या की, “या प्रकरणात महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. मात्र मीडियातून मिळालेल्या व्हिडिओंच्या आधारे नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आम्ही चौकशीची मागणी केली आहे. पीडित महिलेशी चार ते पाच वेळा संपर्क केला गेला आहे. जेव्हा तक्रार येते, तेव्हा आयोगाकडून कारवाई केली जाते.”
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “स्थानिक पोलीस स्टेशन, बरोसा सेल आणि कौटुंबिक न्यायालयात तक्रार दिल्यानंतर जर न्याय मिळत नसेल, तर महिला आयोग तुमच्यासाठी आहे. आम्ही सर्व तक्रारी गांभीर्याने घेतो आणि आवश्यक ती कारवाई करतो. तुम्ही पाठपुरावा करा, आयोग तुमच्या न्यायासाठी कटिबद्ध आहे.”