
लखनऊ: नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी (दि.३०) कानपूर भेटीदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांची पत्नी ऐशन्या द्विवेदी बरोबरच वडील संजय द्विवेदी आणि आई सीमा द्विवेदी हे देखील उपस्थित होते. ही भेट भावनिक वातावरणात झाली, जिथे पंतप्रधानांनी शुभम द्विवेदीच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि त्यांच्या धैर्याला तसेच बलिदानाला श्रद्धांजली वाहिली.
यादरम्यान, ऐशन्याशी बोलताना पंतप्रधानांनी तिच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि म्हणाले की, देशाला तुमच्या पतीचा अभिमान आहे, त्यांचे बलिदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. सरकार तुमच्यासोबत आहे. त्यांनी या घटनेबद्दल दुःखही व्यक्त केले. पंतप्रधानांच्या भेटीने वातावरण भावनिक झाले आणि उपस्थित लोकांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले. दरम्यान द्विवेदी कुटुंबाने पंतप्रधानांचे भेटीसाठी आभार मानले, आणि त्यांचे विचारदेखील मांडले.
शुभम द्विवेदीची पत्नी ऐशन्याने मांडली प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर शुभम द्विवेदीची पत्नी ऐशन्या द्विवेदीने प्रतिक्रिया दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही असं सांगितल्याचं ऐशन्याने म्हटलं आहे. तसेच त्यांनी आम्हाला आणखी एका भेटीचं आश्वासन दिल्याचं ऐशन्या द्विवेदीने सांगितलं आहे.
"डोक्यावर कोणीतरी मोठ्या व्यक्तीने हात ठेवला आहे असे वाटले"
शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर त्यांच्या भावनिक भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, जणू काही एखाद्या मोठ्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे असे वाटले... पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलल्यानंतर मी खूप भावनिक झाळे. ऐशन्या यांनी पंतप्रधानांसोबतच्या या भेटीचे वर्णन एक जिव्हाळ्याचा आणि सक्षमीकरणाचा क्षण म्हणून केले.
पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर शुभम द्विवेदीचे वडील संजय द्विवेदी म्हणाले की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवादाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आल्याबद्दल आम्ही आभार मानतो. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण देश पंतप्रधानांसोबत आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हाला सांगितलं की दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच राहील.यावेळी पंतप्रधान मोदीही भावूक झाले."
कानपूरचे खासदार रमेश अवस्थी यांनी एका आठवड्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाला भेटण्याची विनंती केली होती. त्यानंतर मोदींनी आज(दि. ३०) शुभमच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.