Friday, May 30, 2025

विशेष लेख

अणुशास्त्रज्ञ एम. आर. श्रीनिवासन

अणुशास्त्रज्ञ एम. आर. श्रीनिवासन

विलास पंढरी


प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर आणि भारतातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणारे अणुऊर्जा शास्त्रज्ञ एम. आर. श्रीनिवासन अशा दिग्गजांचे एकाच दिवशी निधन व्हावे हा दैवदुर्विलास किंवा दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल.


या दोन दिग्गज शास्त्रज्ञांनी २० मे रोजी अखेरचा श्वास घेतल्याने भारतीय विज्ञान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. दोघांच्याही वैज्ञानिक योगदानामुळे जागतिक स्तरावर भारताची ओळख मजबूत झाली. जयंत नारळीकर आणि एम. आर. श्रीनिवासन या दोन्ही भारतीय शास्त्रज्ञात काही विलक्षण साम्ये तर काही मामुली फरक होते. दोन्ही शास्त्रज्ञांनी आधुनिक भारत निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः त्यांनी विज्ञान, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.


साम्ये :


१. वैज्ञानिक क्षेत्रात योगदान :
जयंत नारळीकर आणि एम. एस. श्रीनिवासन दोघेही विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे शास्त्रज्ञ होते. जयंत नारळीकर हे खगोलशास्त्रज्ञ होते, तर एम. आर. श्रीनिवासन हे अणुऊर्जा शास्त्रज्ञ होते.


२. वैज्ञानिक अंत:प्रेरणा :
आपल्या अंत:प्रेरणेने डॉ. जयंत नारळीकर आणि एम. एस. श्रीनिवासन या दोघांनीही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारत विज्ञानाची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत होते. नारळीकर यांनी तर संशोधन करत विज्ञान कथा, विज्ञान पुस्तके, लेख, भाषणे आणि विविध कार्यक्रमांद्वारे विज्ञानाचा प्रसारही केला.


३. आधुनिक भारतासाठी योगदान :
दोन्ही शास्त्रज्ञांनी आधुनिक भारताच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्राच्या क्षेत्रात, तर एम. एस. श्रीनिवासन यांनी अणुऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले.


४. जागतिक स्तरावर प्रसिद्ध :
डॉ. जयंत नारळीकर आणि एम. एस. श्रीनिवासन दोघेही जागतिक स्तरावर प्रसिद्ध होते, त्यांच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली होती.


५. दोघांनाही पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


६. अशा मोठ्या विभूती जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पाहायच्या असले तरी एक साम्य म्हणून सांगायचे झाले तर दोघेही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे ब्राह्मण होते.


७. जयंत नारळीकर आणि एम. आर. श्रीनिवासन हे दोघेही भारतीय शास्त्रज्ञ होते.


८. दोघांचेही अंत्यसंस्कार सरकारी इतमामात करण्यात आले.


फरक :


डॉ. जयंत नारळीकर खगोलशास्त्र आणि विश्वविज्ञान यावर लक्ष केंद्रित करत होते, तर एम. आर. श्रीनिवासन अणुऊर्जा आणि अणुऊर्जा प्रकल्पांवर काम करत होते. डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञान प्रसार आणि लेखनावर लक्ष केंद्रित केले, तर एम. आर. श्रीनिवासन यांनी अणुऊर्जा प्रकल्पांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले.


दोघांची कार्यक्षेत्रे वेगळी असली तरी शास्त्रज्ञ म्हणून दोघांचेही योगदान देशासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या दोघांचाही जन्म २ ऑक्टोबरचा. शास्त्रीजींचेही देशाप्रति असलेले योगदान महत्त्वपूर्ण असूनही गांधी जयंती त्याच दिवशी येत असल्याने शास्त्रीजी काहीसे झाकोळले जातात. असेच काहीसे डॉ. नारळीकर आणि श्रीनिवासन यांचा मृत्यू एकाच दिवशी झाल्याने एम. एस. श्रीनिवासन झाकोळले गेले. डॉ. जयंत नारळीकर आणि एम. आर. श्रीनिवासन या दिग्गजांची तुलना करणे योग्य नसले तरी डॉ. जयंत नारळीकर यांच्याबद्दल मराठी वृत्तपत्रात जेवढे भरभरून लिहिले गेले, त्यामानाने एम. आर. श्रीनिवासन यांच्याबद्दल फारच कमी लिहिले गेले. अर्थात डॉ. नारळीकर हे मराठी असल्याने असे होणे साहजिकच आहे.


एम. आर. श्रीनिवासन कोण होते?
भारताच्या आण्विक विकास कार्यक्रमात ठळक योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञातील महत्त्वाचे नाव म्हणजे एम. आर. श्रीनिवासन. मलूर रामस्वामी श्रीनिवासन यांचा जन्म ५ जानेवारी १९३० रोजी बंगळूरुत झाला. मैसुरू विद्यापीठातून ते मेकॅनिकल इंजिनीअर झाले. त्यानंतर कॅनडातील मॅकगिल विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट संपादन केली. तेव्हा मिळत असलेली परदेशातील उत्तम पगाराची नोकरी त्यागून स्वदेशसेवेसाठी मायभूमीची वाट धरत भारताने सुरू केलेल्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमाची महत्त्वाकांक्षी अंमलबजावणी कार्यात श्रीनिवासन सहभागी झाले. त्यांनी १९५५ मध्ये मुंबईत डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अणुऊर्जा विभागात काम सुरू केले. भारताच्या पहिल्या ‘अप्सरा’ या अणुभट्टीच्या उभारणीत श्रीनिवासन यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.


१९५९ मध्ये तारापूर या पहिल्या भारतीय अणुऊर्जा केंद्राच्या उभारणीसाठी मुख्य अभियंता, १९६७ मध्ये तत्कालीन मद्रास अणुऊर्जा केंद्राचे प्रमुख प्रकल्प अभियंता, अणुऊर्जा विभागाच्या ऊर्जा प्रकल्प अभियांत्रिकी विभागाचे संचालक आणि अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली. शेवटी १९८७ मध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद व अणुऊर्जा विभागाचे सचिवपद आणि त्याच वर्षी ‘न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’चे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. कल्पक्कम, रावतभाटा, कैगा, काक्रापार, नरोरा या सर्व अणुभट्ट्यांच्या उभारणीत श्रीनिवासन यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली एकूण


१८ अणुऊर्जा युनिट विकसित करण्यात आली. अणुऊर्जा या विषयावर अनेक सार्वजनिक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली. त्यांचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे ध्यानात येण्यासाठी अणुऊर्जा निर्मिती, तिचे देशसंरक्षणासाठीचे महत्त्व इत्यादींची तांत्रिक माहिती थोडक्यात पाहुयात.


भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विकासात आणि 'दाबित जड पाणी अणुभट्टी' (प्रेशराइज्ड हेवी-वॉटर रिॲक्टर)च्या विकासात श्रीनिवासन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अणुऊर्जा किंवा अणुप्रतिक्रियेमध्ये, क्रिटिकलिटी म्हणजे एक अशी अवस्था, जिथे विखंडनक्षम सामग्रीचे प्रमाण इतके असते की, अणुप्रतिक्रिया आपोआप सुरू तर राहतेच शिवाय ती स्वतःला टिकवूनही ठेवते. यात श्रीनिवासन यांचे विशेष योगदान आहे.

अणुप्रक्रियेचा वापर अणुऊर्जा निर्मितीसाठी केला जातो, जिथे अणुभट्ट्यांमध्ये अणूंचे विभाजन करून ऊर्जा निर्माण केली जाते. अणुप्रक्रियेचा वापर अणुबॉम्ब तयार करण्यासाठीही केला जातो. यात अणूंचे विभाजन करून प्रचंड ऊर्जा निर्माण केली जाते, ज्यामुळे प्रचंड विध्वंस होऊ शकतो. अणुबॉम्बमध्ये युरेनियम किंवा प्लुटोनियमचा वापर केला जातो आणि तो विखंडणावर अवलंबून असतो. ही एक अणुअभिक्रिया असते ज्यामध्ये एक केंद्रक किंवा अणू दोन तुकड्यांमध्ये मोडला जातो.


हायड्रोजन बॉम्ब बनवण्यासाठी, युरेनियम किंवा प्लुटोनियम तसेच ड्युटेरियम आणि ट्रिटियम नावाच्या हायड्रोजनच्या दोन इतर समस्थानिकांची आवश्यकता असते. हायड्रोजन बॉम्ब फ्यूजनवर अवलंबून असतो, ज्यामध्ये दोन वेगळे अणू घेऊन त्यांना एकत्र करून तिसरा अणू तयार करण्याची प्रक्रिया होते, जी अणुबॉम्ब बनविण्याच्या प्रक्रियेपेक्षा खूपच जटिल असते. हायड्रोजन बॉम्बला थर्मोन्यूक्लियर बॉम्ब असेही म्हणतात. अणुबॉम्बच्या तुलनेत ते बनवणे अधिक क्लिष्ट आहे. यामध्ये, अणूंचे विघटन आणि विखंडन म्हणजेच अणूंचे तुटणे आणि जोडणे या दोन्ही प्रक्रिया होतात. पहिल्या टप्प्यात, प्लुटोनियम किंवा युरेनियमचे अणू विखंडित होतात.


नंतर स्फोटकाच्या मध्यभागी हायड्रोजन वायू टाकला जातो, ज्यामुळे स्फोट अधिक शक्तिशाली होतो. यामुळे दुसऱ्या टप्प्यात अणूंची जोडणी होते. या दुसऱ्या टप्प्यात, अनेक पट जास्त ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्बची विध्वंसकता अणुबॉम्बच्या हजार पटीने जास्त असते. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन आणि भारत यांनी हायड्रोगॅस बॉम्बसह शस्त्रांची चाचणी केल्याचे मानले जाते. १९९८ मध्ये भारताने पाच अण्वस्त्रांची चाचणी केली. त्यात एक हायड्रोजन बॉम्ब होता. पाकिस्तानकडे असा हायड्रोजन बॉम्ब असण्याची शक्यता नाही. ऑपेशन सिंदूरनंतर तर पाकिस्तानच्या अणुक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


एम. आर. श्रीनिवासन यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार :
जागतिक आणि राष्ट्रीय प्रभाव : डॉ. श्रीनिवासन यांनी व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे वरिष्ठ सल्लागार (१९९०-९२), नियोजन आयोगाचे सदस्य (१९९६-९८) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य (२००२-०४, २००६-०८) म्हणून काम केले. त्यांनी कर्नाटक उच्च शिक्षण कार्यदलाचे (२००२-०४) अध्यक्षपदही भूषवले.


त्यांना पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (१९९०), आणि पद्मविभूषण (२०१५) हे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय खालील पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळाचा हीरक महोत्सवी पुरस्कार.


विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी संजय गांधी पुरस्कार.


इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया)चा सर्वोत्कृष्ट डिझायनर पुरस्कार.


बंगळूरु येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार.


विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी ओम प्रकाश भसीन पुरस्कार.


भारतीय विज्ञान काँग्रेसकडून होमी भाभा यांना सुवर्णपदक.


इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार.


अशा या दोन्ही दिग्गज भारतीय शास्त्रज्ञांना भावपूर्ण श्रद्धांजली….

Comments
Add Comment