
२ नवे रुग्ण, प्रशासन सतर्क
सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वारीतील सहभागींसाठी जय्यत तयारी सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. माळशिरस तालुक्यातील राऊतनगर-अकलूज आणि माळीनगर येथे दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर रुग्णांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने ते खासगी ऐपेक्स आणि ऱ्हीदम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. खाजगी लॅबमध्ये तपासणीनंतर दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ संबंधित कुटुंबातील सर्वांची तपासणी केली. यातील एका रुग्णाने प्रवास केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने आषाढी वारीच्या तयारीदरम्यान विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी २५,००० रॅट किट्स, १०,००० आरटीपीसीआर ट्यूब्स, १०,००० एन-९५ मास्क, ५०,००० सर्जिकल मास्क, ५०० पीपीई किट्स, १००० सॅनिटायझरच्या बाटल्या आणि १०,००० हॅन्ड ग्लोज मागवण्यात आले आहेत.

३५.३२ मीटर रुंद व ५० मीटर रुंद स्लॅब कास्टिंग सुरू मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील विरार स्थानकाच्या पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. पहिल्या ...
डॉ. शिंदे यांनी नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन केले आहे. लक्षणं जाणवली तर तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, तसेच ज्या नागरिकांना आधीपासून इतर आजार आहेत त्यांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि लसीकरण पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या ४२५ अॅक्टिव्ह रुग्ण असून फक्त मागील २४ तासांत ७६ नवे रुग्ण आढळले. देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये असून त्यानंतर महाराष्ट्र आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्लीमध्ये २६ मेपर्यंत १०४ सक्रिय रुग्ण होते.
देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने केंद्र आणि राज्यांची आरोग्य यंत्रणा अॅलर्ट झाली आहे. मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यांत रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक प्रशासनालाही सजग राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, खबरदारी बाळगून नियमांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.