
२८ धरणातील जलसाठ्यात ११ टक्क्यांनी वाढ
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कोलाड पाटबंधारे विभागाच्या २८ धरणांत २१ मे रोजी २७ टक्केच जलसाठा शिल्लक होता. सात धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक होता; मात्र त्यानंतर चार-पाच दिवस सलग पडलेल्या पावसाने त्यांच्या जलसाठ्यात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुतारवाडी धरण शंभर टक्के भरले असून, त्याखालोखाल पाभरे धरण भरले आहे. धरणांमधील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता मिटणार आहे.
रायगड जिल्ह्यात मुरुड, तळा, रोहा, पेण, उरण आणि अलिबाग तालुक्य़ात प्रत्येकी एक, सुधागड तालुक्यात पाच, श्रीवर्धन तालुक्यात तीन, म्हसळा तालुक्यात दोन, महाड तालुक्यात चार, कर्जत तालुक्यात, खालापूर तालुक्यात तीन, पनवेल तालुक्यात तीन, या १३ तालुक्यांत २८ धरणे आहेत. यामधून जिल्ह्यातील, तसेच नवी मुंबईतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या सर्व धरणात ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता असून, मे महिन्यापर्यंत जलसाठा कमी होत जातो. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात २८ धरणात यावेळी २७ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे मे महिना संपेपर्यंत पाण्याचे संकट गडद होण्याची शक्यता होती; मात्र २५ मेपासून सुरू झालेल्या पावसाने जलसाठा वाढण्यास मदत मिळाल्याने पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे.सात दिवसात सरासरी ५०४ मिमी पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात २२ मेपासून धुवाँधार पाऊस पडल्याने आतापर्यंत सरासरी ५०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक २२१ मिमी पावसाची नोंद मुरुड तालुक्यात झाली, तर सर्वात कमी १९२ मिमी नोंद माणगावमध्ये झाली आहे. आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर रस्ते खचले आहेत. बुधवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर अर्धवट तुटलेली झाडे तोडण्याचे काम ठिकठिकाणी सुरू होते.
काही ठिकाणी अर्धवट तुटलेली घरे व्यवस्थित करण्याचे काम सुरू होते. रस्त्याच्या कडेला तुटलेली झाडे तोडण्याकरिता काही तासांसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. म्हसळा, मुरुड, श्रीवर्धन, माथेरान, रोहा या तालुक्यांमध्ये ५०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत १३ कच्च्या आणि २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे.
आठवडाभरातील तालुकानिहाय पर्जन्यमान
आठवडाभरात मुरुड तालुक्यात तब्बल २९१ मिमी, तर म्हसळा तालुक्यात ७८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल श्रीवर्धन ७७०, तळा ६३९, पनवेल ६०५.५, रोहा ५०४, माथेरान ४०९, सुधागड ३७२, पेण ३६८, महाड ३२८, खालापूर २८६, उरण २५४, कर्जत २४२, माणगाव १९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.