
माझे कोकण : संतोष वायंगणकर
महाराष्ट्रातील शेतकरी बेसावध असतानाच पाऊस सुरू झाला. सुरुवातीला अवकाळी पाऊस आहे, तो लगेच जाणार अशाच चर्चा केल्या जात होत्या. वळवाचा पाऊस आहे, असं वाटत असताना १०-११ मेपासून पावसाने हजेरी लावली आणि संततधार सुरूच ठेवली. तो आता थांबेल... आता थांबेल असे वाटत असताना मान्सून दाखल झाला आणि कोकणवासीयांची सर्व गणितेच बिघडून गेली. पावसाळी हंगामाची कामं आरामात करून दरवर्षी घरातील जळणासाठी लागणारा लाकुडफाटा गोळा करत त्याची साठवण केली जाते; परंतु यातलं काहीच करायला मिळाल नाही. उन्हाळ्यात पापड, लोणची, सांडगे असे एक ना अनेक जेवणातील पदार्थ मे अखेरपर्यंत तयार केले जातात. वर्षभराची ‘बेगमी’ कोकणवासीय करतो. यावेळी त्यातलं काहीच करता आलं नाही.
पाऊस पडला की जांभुळ, करवंदांचा रानमेवा खाता येत नाही. यावर्षी करवंद जाळीवरच राहिली. मनसोक्त करवंदांचा आस्वाद घेता आला नाही. असे संवाद चाकरमान्यांमध्ये ऐकायला मिळत आहेत. आंब्याचं पीक कमी होतं. त्यात या पावसाचे आगमन, नंतर आलेला आंब्याचा बहरही आंबाबागेतच राहिला. कोकणातील कलिंगड लागवड करणारा शेतकरीही पूर्णपणे अडचणीत आला. त्याचे लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. बागेतली कलिंगडं बागेतच सोडून द्यावी लागली. मे महिन्याचे वीस दिवस आणि जून महिन्याचा पहिला आठवडा यामध्ये कलिंगडला चांगला दर येणार होता. ती सर्व कलिंगडं बागेतच सोडून देण्याची वेळ आली. मात्र कलिंगड बागायतदार शेतकरी नुकसान होऊनही डोक्याला हात लावून न बसता पुढील वर्षी चांगला हंगाम येईल या अपेक्षेत आहे.
कोकणात अवकाळी पाऊस पडतो; परंतु तो दोन-चार दिवसांपुरता पाहुणा असतो. कोकणातील पावसाची खरी सुरुवात ही मृगनक्षत्राला होते. ७ जूनला पाऊस सुरू होतो. त्यामुळे शेतीची कामे, त्याची आवराआवर शेतकरी मे अखेरपर्यंत करत असतो. शेतकऱ्यांचे सर्व अंदाज यावेळी निसर्गाने चुकवले. शेतीच्या व्यवस्थापनात पावसाच्या एंट्रीने जसं बिघडवलं तसंच वीज वितरण, टेलिफोन या विभागांच्या पावसाळ्यापूर्वी झाडांमधून गेलेल्या लाईनक्लिअर करून घेण्याची कामही होऊ शकलेली नाहीत. ७ जूनला पावसाची सुरुवात होते. पुढचे चार-पाच महिने कोकणात संततधार कोसळत असतो. पावसाच्या या वर्षीच्या या अचानक येण्याने कोकणातील भात पेरणी करण्यापूर्वीच नुकसान झाले. भातशेतीतली भाजावळ, जमिनीची मशागत शेतकऱ्यांना करता आली नाही. यातही मशागत करण्यात आली असली तरीही मेच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेतात पाणी असल्याने नांगरणी आणि पेरणी कशी करायची? या अशा विचित्र स्थितीत कोकणातील शेतकरी संभ्रमावस्थेत गेला.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना या पावसात भात पेरणी करायची की नाही याच्या कोणत्याही सूचना आल्या नाहीत. अर्थात कृषी विभागालाही पावसाने संभ्रमित केले. या सर्वांचा परिणाम म्हणजे कोकणातील शेतकरी भातपेरणी करू शकला नाही. भात पेरणी, लावणीनंतर भातपीक तयार होण्याचा कालावधी किमान १२० ते १४० दिवसांचा कालावधी असतो. कोकणात एकतर भातशेती करणाऱ्यांची संख्या कमीच आहे. त्यात या अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वच शेतीची कामे जागच्या-जागी राहिली आहेत. कोकणात मृग नक्षत्रानंतर पाऊस सुरू झाला की कोकणातील नदी, नाले, गावातील वाडी-वस्तीतील ओहोळ तुडुंब भरून वाहतात. मत्स्यप्रेमी चढणीचे मासे पकडण्यासाठी जातात. चढणीचे मासे पकडून त्याची मच्छिकरी बनवणं आणि तांदळाची भाकरी आणि भात यासोबत मनसोक्त आनंद घेत त्याचा आस्वाद घ्यायचा. मासे कुठल्या ओहोळात काट्यातून उतरून पकडले याच्या सुरस गंमतीदार चर्चा कोकणातील चहा-भजीच्या टपरीवर ऐकायला मिळतात. चढणीचे मासे पकडण्याचे हे मत्स्यपुराण ऐकण्यात कोकणातील अनेक पिढ्या गेल्या.
पूर्वीचा शेतीच्या हंगामात पावसाळी हंगामातील खान-पान एकदम भारी असायचे. पिठी भात आणि सोबत सुका बांगडा ही तर मेजवानीच. आजवर मान्सून पहिला केरळमध्ये दाखल व्हायचा आणि नंतर महाराष्ट्रात, कोकणात यायचा; परंतु यावर्षी उलटच घडले. पहिल्यांदा पाऊस कोकणात आला आणि आता केरळमध्ये दाखल होतोय. यावर्षीच्या पावसाने सर्वांचे अंदाज चुकवले. एकिकडे जशी शेतकऱ्यांची पेरणीपासून अनेक काम राहिली. ऐन मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने कौलांच्या घरांच्या छपरांची यावर्षी साफसफाई करता न आल्याने कोकणातील अनेक घरांवर मेनकापड दिसले. कोकणातले कोकम. पुढची प्रक्रिया होऊ न शकल्याने साहजिकच कोकणातून यावर्षी कोकमच गायब होईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यात आलेल्या पावसाने कोकणचं सारंच बिघडवलंय.
या पावसाळीविषयी त्रिंबकचे बाबू घाडीगांवकर यांनी मीरगाआधीच व्हाळ भरलो या कवितेत छान वर्णन केलेय...अन् मालवणी माणसाची व्यथाही मांडलीय...
ते म्हणतात,
गीम जसो तापाक लागलो
घामान जीव जाव्क लागलो
मधीच असो पाव्स पडलो
मीरगाआधीच व्हाळ भरलो
लग्ना आजून बाकी तरी
मांडव पुरो भीजान गेलो
पाव्स असो वत वत वतलो
मीरगाआधीच व्हाळ भरलो
कुणगे आता झाडू कसे?
तसोच तरवो पेरूचो इलो
बेळी थोडी कुडीन तवसर
मीरगाआधीच व्हाळ भरलो
ओसाड माळ हिरवो झालो
टायकुळो रुजान वर इलो
आंब्यांखाली चिखल झालो
मीरगाआधीच व्हाळ भरलो
तळयेचो पाट मोकळो झालो
पोखर आताच वताक लागलो
व्हाळयेत बांडूक डरवाक लागलो
मीरगाआधीच व्हाळ भरलो
कुरलें चढले मासो चढलो
बंगो रटमाट करूक लागलो
भाटी मळो भरान गेलो
मीरगाआधीच व्हाळ भरलो
सगळो कोकण हिरवो झालो
कोकणचो कॅलिफोर्निया झालो
गरमी उकाडो नायसो झालो
मीरगाआधीच व्हाळ भरलो!