
मुंबई : धारावी हे देशातील वैशिष्ट्यपूर्ण उद्योग समूहांचे विस्तीर्ण क्षेत्र आणि महत्वाचे आर्थिक केंद्र आहे. त्यादृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचे जतन करत पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने विकास करावा, स्थानिक कारागिरांच्या, व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथी गृह येथे धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी, यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करावयाचा असून धारावीतील व्यावसायिक उलाढाल सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याला प्राथिमकता देत या ठिकाणच्या गुणवंत कारागिरांना, त्यांच्या कौशल्य आधारित विविध व्यवसायांच्या पुर्नवसनास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. धारावीमधील प्रत्येकाला पुनर्वसन प्रकल्पात न्याय मिळाला पाहिजे, येथील प्रत्येकजण या पुनर्विकास प्रकल्पासाठी पात्र असणार आहे, त्याचे निकष वेगवेगळे असतील, मात्र धारावीतील प्रत्येकाला पुर्नवसनाचा लाभ मिळाला पाहिजे, याची खबरदारी घेण्यात यावी. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन लोकभावना जपून समन्वयपूर्वक विकासाची कामे करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्व संबंधित विभागांनी विकास प्रकल्पासाठी आवश्यक ती मान्यता, पुढील कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश दिले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उपमुख्यमंत्री (नगरविकास) कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.