
दि. २६ मे २०२५ रोजी मुंबई, ठाणे, रायगड, कोकणाला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. मुंबईत सर्वत्र दोनशे ते अडिचशे मिमी पाऊस कोसळला आणि राजधानीतील रस्ते व रेल्वेचे मार्ग पाण्याखाली गेले. खरे तर जोरदार पावसानंतर मुंबईचे जनजीवन विस्कळीत होते हे काही नवीन नाही. त्याची मुंबईकरांना संवय झाली आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे जुलै महिन्यात मुंबईत मोठा पाऊस कोसळतो व दोन-तीनदा तरी मुंबई अस्ताव्यस्त होते. पण यावर्षी मान्सूनचा पाऊस तब्बल दोन आठवडे अगोदरच मुंबईत येऊन थडकला. नालेसफाई किंवा संरक्षक भिंती, कचरा सफाईची जी कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करायची होती, त्या अगोदरच झालेल्या अतिवृष्टीने मुंबईची दाणादाण उडाली. एका दिवसानंतर मुंबईचे जनजीवन सुरळीतही झाले. पण मुंबईला सेवा-सुविधा देणाऱ्या मुंबई महापालिका, एमएमआडीए आदी डझनभर यंत्रणावर टीका होणेही समजण्यासारखे आहे. मुंबईसाठी राबणाऱ्या यंत्रणा अपेक्षेपेक्षा पाऊस अगोदर आला म्हणून आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. ज्यांनी पावसाळी कामे पूर्ण केली नव्हती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणीही रास्त आहे. पण मुंबईत जिकडे तिकडे रस्त्यावर व रेल्वे मार्गावर पाणी साचले म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खापर फोडणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा सेनेने, त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राने आणि पक्षप्रमुखांच्या आमदार असलेल्या पुत्राने फडणवीस व शिंदे यांच्या नावाने शिमगा केला व मुंबई ठप्प होण्यास तेच जबाबदार आहेत असा कांगावा केला.
विधानसभा निवडणुकीत जनतेने उबाठा सेनेला त्यांची लायकी काय आहे हे दाखवून दिले आहे. जोपर्यंत उबाठा सेना भाजपाच्या हातात हात घालून निवडणुका लढवत होती तोपर्यंत लोकांनी उबाठा सेनेला भरीव यश दिले. पण ज्यावेळी सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी कमळाची साथ सोडून राहुल गांधींना जवळ केले व हातात पंजा घेऊन भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र जनतेने त्यांनाच चांगला धडा शिकवला. महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीचे २३५ आमदार आहेत तर महाआघाडीचे पन्नास सुद्धा आमदार नाहीत. सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असभ्य आणि असंसदीय भाषेत टीका करणाऱ्या उबाठा सेनेचा जनाधार सतत घटत चालला आहे. उबाठा सेनेवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. उबाठा सेनेतून रोज कुणी ना कुणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहे. वास्तवतेचे आणि बदललेल्या परिस्थितीचे भान ठेऊन तरी पक्षप्रमुख व त्यांच्या पुत्राने वागले पाहिजे पण अजूनही शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवरच त्यांचा कारभार चालू आहे असे दिसते.
भाजपाचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे पितापुत्रांचे वस्त्रहरण केले. मोदी, शहा, फडणवीस यांच्यावर टीका केलीत तर याद राखा, तुमचा भ्रष्टाचाराचा भांडाफोड करू असा सज्जड दम त्यांना दिला. मुंबई महापालिकेत पंचवीस वर्षे सत्ता असताना मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून काय दिवे लावलेत अशा शब्दांत त्यांनी ठाकरे पितापुत्रांना खडसावले. त्या पंचवीस वर्षांत मुंबई भ्रष्टाचारमुक्त का झाली नाही? त्या २५ वर्षांत उबाठा सेनेने मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ठोस प्रयत्न का केले नाहीत? पावसाळ्यात मुंबई बेटावर मुसळधार पाऊस कोसळत असताना त्याचवेळी समुद्राला भरती असेल, तर मुंबईत सखल भागात पाणी तुंबते हे उबाठा सेनेचे नेतृत्व करणाऱ्यांना ठाऊक नसावे याचे मोठे आश्चर्य वाटते. वरळी येथील आचार्य अत्रे भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पावसाचे पाणी घुसले व स्टेशनला तलावाचे स्वरूप आले हे अघटीत घडले. पण त्याला काय फडणवीस व शिंदे हेच थेट जबाबदार आहेत काय? मग या निकषाने कोरोना काळात महाराष्ट्रात दीड लाख लोकांचा मृत्यू झाला, देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले तेव्हा राज्याचे नेतृत्व कुणाकडे होते, हे लोक अजून विसरलेले नाहीत. राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे, गणेश नाईक, गजानन कीर्तिकर, अशा नेत्यांच्या वलयामुळे व त्यांनी केलेल्या अफाट कामांमुळे शिवसेना विस्तारली. ज्यांनी मुंबई, कोकणात आणि महाराष्ट्रात शिवसेना घराघरांत पोहोचवली ते नेते आज उबाठा सेनेत राहिलेच नाहीत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री बनले व त्यांनी स्वत:च्या मुलाला थेट कॅबिनेट मंत्रीपद दिले त्या दिवसापासून शिवसेनेला घरघर लागली व नंतर एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा फडकावून आपला पक्ष हीच खरी शिवसेना म्हणून सिद्ध करून दाखवले. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलीच पण लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेनेही त्यावर शिक्कामोर्तब केले. एवढे झाल्यावरही ठाकरे पितापुत्रांचे डोळे उघडले नाहीत. त्यांना जळीस्थळी एकनाथ शिंदे दिसत आहेत. त्यांना मिंधे म्हणून संबोधणे हे महाराष्ट्राच्या जनतेला मुळीच आवडलेले नाही. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा व उपमुख्यमंत्र्यांचा उबाठा सेना सतत अवमान करीत आहे, त्याची शिक्षा जनतेच्या न्यायालयात त्यांना वेळोवेळी मिळते आहेच.
मुंबईत दि. २६ जुलै २०२५ रोजी ९४४ मिमी पाऊस पडला होता. तेव्हा मुंबईचे जनजीवन ठप्प झाले होते, त्यातूनही मुंबई दोन-तीन दिवसांत बाहेर आली. तेव्हा मुंबई पाण्यात असताना उद्धव ठाकरे यांना आपला वाढदिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये करायचे सुचले तरी कसे? उबाठा सेना आता त्यांच्या कर्माने विरोधी पक्षात आहे. विधानसभेत साधे विरोधी पक्षनेते पदही या पक्षाला मिळालेले नाही. चार-पाच महिन्यांवर महापालिका निवडणूक आहे. पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेतील सत्ता हाच उबाठा सेनेचा आणि मातोश्रीचा श्वास होता. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेच्या प्राणवायूला उबाठा सेना मुकली आहे, त्यातूनच त्यांच्या पक्षाला गळती लागली आहे. केवळ मोदी, शहा, फडणवीस व शिंदे यांच्यावर बेलगाम व बेताल टीका करून पक्षाला सत्ता तर मिळणार नाहीच पण जो पक्ष थोडाफार शिल्लक आहे तोही टिकणार नाही. फडणवीस-शिंदेंवर सतत टीका करण्यापेक्षा आपले घर वाचविण्याचा प्रयत्न पक्षप्रमुख व त्यांच्या पुत्राने करावा...