
मुंबई : प्रतिवर्षाच्या तुलनेत मुंबईत यंदा पंधरा दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. प्रारंभीच अतिशय जोरदार पावसामुळे महानगरपालिकेच्या कामांवर काहीसा परिणाम झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. विशेषतः नाल्यांमधून गाळ उपसण्याच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. असे असले तरी पावसाळी कामांचा वेग कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये, यासाठी आधीच्या नियोजनामध्ये योग्य त्या सुधारणा कराव्यात, आवश्यक ते बदल अंगीकारावेत. नदी - नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामे पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण करावीत, असे महानगरपालिका महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी नमूद केले.
सततच्या व जोरदार पावसामुळे मुंबईत दोन दिवसांपूर्वी उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या पावसाळी कामांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी २८ मे २०२५ रोजी फेरआढावा घेतला. त्यावेळी त्यांनी यंत्रणेला विविध निर्देश दिले. महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेने केलेल्या नियोजनानुसार पावसाळापूर्व कामे वेगाने सुरु असतानाच, दरवर्षाच्या तुलनेत पंधरवड्यापूर्वीच मान्सूनचे मुंबईत आगमन झाले आहे. परिणामी नाले स्वच्छता, रस्ते व इतर कामांवर देखील काहीसा परिणाम झाला, ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी नागरी सेवा-सुविधांची सर्वोच्च प्राथमिकता लक्षात घेता पावसाळी उपाययोजनांमध्ये परिस्थितीनुरुप योग्य सुधारणा कराव्यात, उपाययोजनांना जास्तीत-जास्त वेग द्यावा. सर्व कार्यवाहीमध्ये सजग राहून वेगाने कामे पूर्ण करावीत व यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
अतिसखल व सखल परिसरांमध्ये पावसाचे पाणी शक्यतो साचणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. जोरदार पावसाने पाणी साचताना आढळल्यास त्याचा वेगाने निचरा होईल, यासाठी सजग राहून प्रयत्न करावेत. पावसाळी पाणी साचणारी नवीन ठिकाणे आढळली आहेत, त्या ठिकाणांची संबंधित प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळाचे उपायुक्त यांनी पाहणी करावी. अशी नवीन ठिकाणी का निर्माण झाली त्याची कारणे शोधावीत. त्या ठिकाणांवर करावयाच्या उपायोजना निश्चित कराव्यात, पाणी साचण्याच्या समस्येचे निराकरण करावे, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी केली. सखल व अतिसखल भागांमध्ये तसेच जोरदार पावसावेळी पाणी साचू शकेल, अशा सर्व संभाव्य ठिकाणांवर मिळून ४१४ उदंचन संच लावण्याचे नियोजन यंदा केले आहे. त्यानुसार, सर्व ठिकाणी उदंचन संच (पंप सेट) बसविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे, याची खातरजमा करावी. उदंचन यंत्रणा स्थापन करुन ती कार्यान्वित करण्याची कार्यवाही पुढील २४ तासात पूर्ण करावी.