
नियोजन विभागाकडून १४८ कोटी खर्चास मान्यता.
मुंबई (प्रतिनिधी) : देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राज्यातील अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या मार्ग मोकळा झाला आहे. वित्त आणि नियोजन विभागाने १४७ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या 'अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार आणि विकास आराखड्या'स सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला आहे. या निर्णयात लेण्याद्री गिरिजात्मज मंदिराचा समावेश नाही. अष्टविनायक आराखड्यामुळे विकास अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. अष्टविनायक क्षेत्रांच्या विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि विकास आराखड्यास गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे यासंबधीच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजी चौडी (जि. अहिल्यानगर) येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. अष्टविनायक मंदिर विकासाचा आराखडा २०२१- २२ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यावेळी तो आराखडा ९२ कोटी १९ लाख रुपयांचा होता. तर २०२४ मध्ये १४७ कोटी ८१ लाख रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यास आज सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
अष्टविनायक विकास आराखड्यातील एकूण १४७ कोटी ८१ लाख रुपयांपैकी १०० कोटी ५३ लाख रुपये मंदिर जीर्णोद्धार, परिसर विकासावर तर विद्युतीकरण, रोषणाई, वास्तूविशारद, जीएसटी आदींवर ४७ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे अष्टविनायक क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार असून त्याबद्दल भाविकांकडून, नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
मंदिर आणि निधी
मोरगाव श्रीमयुरेश्वर... ८ कोटी २१ लाख,
थेऊर श्रीचिंतामणी.... ७ कोटी २१ लाख,
ओझरच्या श्रीविघ्नेश्वर.. ७ कोटी ८४ लाख
रांजणगाव श्रीमहागणपती.... १२ कोटी १४ लाख
महड श्रीवरदविनायक.... २८ कोटी २४ लाख
पाली श्रीबल्लाळेश्वर..... २६ कोटी ९० लाख
अहिल्यानगर श्रीसिद्धटेक.... ९ कोटी ९७ लाख