मेघना कालेकर
कधी आनंदाचा तर कधी उत्सुकतेचा, काळजीचा विषय 'स्त्री'साठी. एखाद्या महिन्याला चुकला तर आनंद आणि काळजी वाटणारा. दर महिन्याला वाट पाहायला लावणारा, तर कधी संकोच व त्याच मनाला गेलेला विषय...
"मासिक पाळी"
स्त्रीच्या आयुष्यातील 'परीपूर्णता' ठरणारा हा महत्त्वाचा नैसर्गिक घटक. स्त्रीच्या जन्मापासून वाढीच्या प्रत्येक टप्प्यात आणि सरतेशेवटी ही क्रिया बंद होण्याचा काळ या मासिक पाळीवर ठरतो. मुलगी वयामध्ये आली हे मासिक पाळीमुळे जाणवते. हा विषय कधी संकोच तर कधी टाळला जाणारा विषय होता. धार्मिक कार्यामध्ये 'मासिक पाळी' येणे व ती येऊ नये म्हणून विविध शास्त्रीय/अशास्त्रीय औषधोपचार स्त्रियांना सुचविले जातात. अजूनही 'मासिक पाळी'च्या काळामध्ये 'धार्मिक कार्य' करणे टाळले जाते. तर कधी ते 'चार' दिवस महिन्यातून घरात बाजूला बसविले जाते.
विवाहाच्या वयामध्ये 'मासिक पाळी' येणे हे महत्वाचे मानले गेले. कारण त्यावर वंशवृद्ध ठरते. दर महिन्याला पाळीची हजेरी असणे महत्त्वाचे ठरते. कुमारी मुलीला दर महिन्याला मासिक पाळी येणे हे आई-वडील व पालकांच्या काळजीचा विषय तर नव विवाहितेला एखाद्या महिन्याला मासिक पाळी चुकणे, हा आनंदाचा विषय. नव्या वंशवेलीच्या आगमनाची ही सूचकता.
काही भागामध्ये मुलींच्या 'मासिक पाळी' येण्याचा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणाच्या प्रथेप्रमाणे, काही धार्मिक... काही ठिकाणी नवीन वस्त्रे देऊन मुलींचे कौतुक केले जाते. तर आपले आता अल्लड बालपण संपले. अजून जबाबदारीने वागायचे, प्रत्येक गोष्ट करताना समंजसपणे वागावे लागेल, हे समजून जाते. या विषयाबद्दल असणारी, शास्त्रीय माहिती तिची उपयोगिता, आवश्यक असणारी स्वच्छता, समज व गैरसमज या विषयी आता सर्वत्र जागरूकता वाढली आहे. अगदी घरच्या जुन्या कपड्यांपासून वापरली जाणारी साधने ते आता अत्याधुनिक सॅनिटरी नॅपकिन यांचा शोध व वापर, आपले जीवन सुसह्य करतो. देशाच्या काही भागांमध्ये इकोफ्रेंडली सॅनीटरी नॅपकिन तयार केले जातात व वापरले जातात. त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नवीन पद्धती अवलंबिली जाते. धार्मिक कार्यामध्ये मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी विविध औषध योजना अथवा संतती नियमनाचेसाठी केले जाते. योग्य मार्गदर्शन, योग्य तज्ज्ञांचा सल्ला यामुळे जीवघेणे निर्णय घेणे टाळले जाऊ शकते.
"मेनोपॉज" हा मासिक पाळी संपण्याचा काळ आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे 'मासिक पाळी' येणे अथवा बंद होणे, हे अलीकडील लवकर वयामध्ये होते. तेव्हा या काळामध्ये होणारे विविध शारीरिक व मानसिक त्रास यामुळे आपला बहराचा काळ, तारुण्याचा काळ संपत आल्याने आपली प्रौढताकडे वाटचाल सुरू झाल्याचे जाणवू लागते. तर कधी गर्भपिशवीला विविध कारणाने इजा होते, तर कधी अतिरक्तस्त्राव, तर कधी अनैसर्गिक पेंशीची वाढ, तर कधी याविषयीच्या धोकादायक आजारांची भीती यामुळे शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढावी लागते. यासाठी योग्य निदान विविध अत्याधुनिक तपासण्या, संतुलित मन शरीर यांची सोबत आवश्यक ठरते.
कधी वेळेस सर्व काही अनुकूल असून सुद्धा अपत्यहीन असणारी जोडपी पाहण्यात येतात. काही दांपत्य एकमेकांना उत्तम सोबत चांगले सहजीवन जगतात. तर काही वेळेस अनेक वर्षे लग्नाला होऊन सुद्धा मुलबाळ होत नसल्याने स्त्रियांचा छळ केला जातो आणि लागोपाठ अनेक मुली जन्माला आल्या म्हणून स्त्रीचा छळ केला जातो. खरे तर अपत्य होणे अथवा न होणे आणि फक्त मुलीच जन्माला येणे याच्या शास्त्रीय कारणांची माहिती अजून समाजात मिळालेली नाही. या विषयांची योग्य जागरूकता शास्त्रीय ज्ञान सर्वांना योग्य वेळेमध्ये मिळाले तर स्त्रियांचे हाल थांबतील असे वाटते.
स्त्रीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात मासिक पाळी नियमित येणे, विवाह व गर्भावस्था या दरम्यान झालेले डोहाळे जेवण, बाळाचे नामकरण पुढे कुटुंब नियोजन आणि मासिक पाळी संपल्याची चाहूल लागणे हे अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत, तर कधी हिंसाचारामधून कुमारिका अल्पवयीन मुलींना याचा सामना करावा लागतो. हे सुद्धा दुर्दैवीच आहे. यांच्या परिवारासाठी घालमेल, चिंता व काळजीचा विषय. विविध प्रसार माध्यमांवर असणाऱ्या जाहिराती, संतती नियमनाच्या उपाययोजना यांची सहज उपलब्ध असणारी साधने, यांचा कधी कधी दुरुपयोग केला जाऊ शकतो.
म्हणून 'मासिक पाळी' हा टाळण्याचा संकोच विषय नाही. विविध तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन, नाटिका, दृश्य चित्र फिती यांचा वापर करता येईल. या 'बहराचे' आपल्याला महत्त्व या माध्यमातून जपता येईल. एक 'बहर' संपेल परत नवीन बहर येणारच निसर्गचक्र अव्याहत चालू राहील.