Thursday, May 29, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात; डिनो मोरियासह आदित्य ठाकरेंची चौकशीची मागणी

मिठी नदी सफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा हात; डिनो मोरियासह आदित्य ठाकरेंची चौकशीची मागणी

शिवसेना उपनेते संजय निरुपम यांचा आरोप


मुंबई : मुंबईत नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामात ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली जात आहे. मात्र डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असून या प्रकरणी आदित्यची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


निरुपम म्हणाले की, गेल्या २० वर्षांत मिठी नदीच्या सफाईसाठी १२०० कोटींचा खर्च झाला आहे. अजूनही मिठी नदीची पूर्ण सफाई झालेली नाही. या प्रकरणात मोठा घोटाळा झाला असून प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने ‘एसआयटीची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल आणि दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. गेल्या २० वर्षात १८ कंत्राटदारांना मिठी नदी सफाईचे काम दिले होते. २००५ पासून २०२२ पर्यंत महापालिकेत उबाठाची सत्ता होती. त्यांच्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कुणालाही मुंबईत कंत्राट मिळायचे नाही हे सर्वांना माहित आहे, असे निरुपम म्हणाले.



मिठी नदीतील नालेसफाईबाबत ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यात अभिनेता डिनो मोरिया यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. मिठी नदी नालेसफाई घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचा संबंध आहे, कारण डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे हे जवळचे मित्र आहेत. दिशा सालियन हत्या प्रकरणात सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबईतील ड्रग्जच्या व्यवसायात डिनो मोरिया बदनाम आहे, असा घणाघात निरुपम यांनी केला.


निरुपम पुढे म्हणाले की, मुंबईत सोमवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यावर उतरुन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली होती. मुंबईकरांना त्रास होऊ नये, याची काळजी उपमुख्यमंत्री शिंदे घेत होते, मात्र जेव्हा २००५ मध्ये मिठी नदीला पूर आला होता तेव्हा ठाकरे कुटुंब मुंबईच्या रस्त्यांवर फिरकले सुद्धा नाही. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत ९०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. त्यावेळी मुंबई तुंबली होती. त्यावेळी बाळासाहेबांना मातोश्रीवर सोडून उद्धव ठाकरे कुटुंबासह ताज हॉटेलमध्ये राहायला गेले होते, अशी टीका निरुपम यांनी केली.



संजय राऊत पाकिस्तानची सुपारी घेऊन बोलत आहेत


ऑपरेशन सिंदूर फेल गेलं, असे वक्तव्य करणारे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत पाकिस्तानची सुपारी घेऊन बोलत आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली. भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरात ऑपरेशन सिंदूरची गौरव गाथा सांगत असताना राऊत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत का, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment