भारताची गरूडझेप

  183

भारत आता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे आणि ही मोदी सरकारच्या आणि देशाच्या १४० कोटी भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. भारत पूर्वी हत्ती आणि सापांचा देश म्हणून ओळखला जात असे. आता त्याचे रूपांतर एका विकसित नव्हे पण विकासाच्या मार्गावर असलेल्या चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत होत आहे ही आपल्या सर्वांसाठी निश्चितच आनंदाची आणि मुजरा करण्यायोग्य बाब आहे. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी ही माहिती नुकतीच दिली आणि भारतापुढे आता चीन, अमेरिका आणि जर्मनी हेच तीन देश आहेत अशीही त्यांनी माहिती दिली आणि ही माहिती केवळ भारतीयाने दिली नाही तर भारतद्वेष्ट्या अशा आयएमएफने दिली आहे. त्यामुळे ही आकडेवारी विश्वसनीय आहे. कारण तेथे तर कुणी मोदी भक्त नाही तर उलट मोदींचा आणि भारताचा द्वेषच करणारे आहेत. भारत आता जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे हे निःसंशय गौरवास्पद आहे. हे श्रेय जसे मोदी यांचे आहे तसेच ते १४० कोटी भारतीयांचे आहे, या देशातील प्रत्येक नागरिकाचे आहे.


भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे आणि त्याला कारण ठरली आहे ती, भारतातील भू राजकीय स्थिती आणि अत्यंत अनुकूल आर्थिक वातावरण. ४ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आज भारताची आहे आणि हे स्थित्यंतर जबरदस्त आहे, तसेच ते देशाची कहाणी सांगणारी आहे. आयएमएफच्या आकडेवारीनुसार भारत आज जपानपेक्षा मोठा आहे आणि भारताच्या पुढे आज फक्त जर्मनी, अमेरिका आणि चीन आहेत. पण हे यश भारताला सहजसाध्य मिळालेले नाही. अर्थव्यवस्थेचा आकार मोजला जातो तो जीडीपीच्या माध्यमातून आणि तोच जपानपेक्षा काहीसा जास्त आहे. आयएमएफच्या अहवालात म्हटले होते की, विकासाचा आऊटलुक २०२५ मध्ये ६.२ टक्के होता. त्याला खासगी सहभाग आणि उपभोगाने विशेषतः ग्रामीण भागात चांगल्या मागणीचा हातभार लागला आहे. त्याशिवाय भारताचे बाजारपेठीय पोटेन्शियल आणि व्यापक होत चाललेले आर्थिक क्षेत्र, वाढते जागतिक व्यापार आणि गुंतवणूक फ्लोमध्ये सहभाग यामुळे भारताची अर्थव्यवस्था आज या मुक्कामाला पोहोचली आहे.


पंतप्रधान मोदी यांनी २०१४ मध्ये सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून भाजपाच सत्तेत आहे आणि त्या काळापासूनच देशाची प्रगती अखंड आणि अविरत सुरू आहे. काँग्रेसच्या काळात गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडाला होता आणि भ्रष्टाराच्या अनेक प्रकरणामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास कमजोर झाला होता. पण मोदी सत्तेवर आल्यावर त्यानी ‘न खाने दूंगा ना खाऊंगा...’ अशी घोषणा दिली आणि त्यानुसार एकही भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. अन्यथा काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चर्चेत होती आणि रोज वृत्तपत्रांना नवीन मसाला पुरवला जात होता. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. हा गुणात्मक बदल मोदी आल्यापासून झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास परत आला आहे आणि त्यामुळे भारत आज चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. पण हे काम सोपे नव्हते. त्यासाठी मोदी यांची विलक्षण जिद्द आणि निर्धार तसेच तमाम भारतीयांची मोदी यांना मिळालेली साथ ही कारणे होती. केवळ आर्थिक विकासाच्या आकडेवारीवर विचार केला तरी मोदी सरकारची कामगिरी या दहा वर्षांत प्रभावी राहिली आहे. अर्थात मोदी यांची ही कामगिरी असामान्य असली तरीही पुरेशी प्रशंसा करण्यालायक मात्र नाही हे कबूल करणे भाग आहे. जरी मोदी सरकारची आर्थिक कामगिरी जबरदस्त असली तरीही कोट्यवधी भारतीय गरीबच आहेत. तसेच नोकऱ्यांचे भयावह वास्तव आहे. त्यामुळे तरुणांना रोजगाराचा लाभ होत नाही तोपर्यंत भारत सुखी आहे असे म्हणवत नाही.

अर्थव्यवस्था जरी समाधानकारक असली तरीही काही बॉटलनेक्स आहेत. त्यात सर्वप्रथम आहे तो गरिबीचा. गरिबी आणि असमानतेचे अंदाज याबाबतचे वास्तविक चित्र समोर येत नाही. मोदी यांनी रस्ते आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर जोर दिला आहे आणि त्यामुळे आपल्याला देशात आज अनेक ठिकाणी चांगले रस्ते आणि पूल तसेच सेतू बांधलेले दिसून येतात. पण त्याबरोबरच डिजिटल प्रणालीचा वापर व्हावा तितक्या प्रमाणात वाढलेला दिसत नाही, यावर मोदींनी विचार केला पाहिजे. कारण चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणायचे आणि व्यवहार तसेच पूर्वीच्या पद्धतीने करत राहायचे हे चांगले नाही. कोणत्याही देशाला ते शोभण्यासारखे नाही. मोदी यांनी शौचालये बांधण्याच्या योजना आणल्या आणि देश हागणदारी मुक्त केला. पण अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी ही स्थिती आहेच आणि शेवटी अमर्त्य सेन यांनी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या माणसाला जोपर्यंत विकासाची फळे मिळणार नाहीत तोपर्यंत त्या विकासाची फळे शेवटपर्यंत पोहोचली असे म्हणता येणार नाहीत. त्याबाबतीत मोदी यांना अजून बरेच कार्य करायचे आहे. पण मोदी हे कार्य करून दाखवतील यात अजिबात शंका नाही. भारताच्या विकासाने झेप घेतली आहे पण महामारीचा काळ आणि त्यादरम्यान झालेले धान्य वितरण वेगाने झाले. ही निःसंशय स्पृहणीय बाब होती, पण त्याच काळात सरकारच्या अन्न बिलात पाच पट वाढ झाली.


मोदींच्या या यशात इतरही काही क्षेत्रांचा वाटा आहे. ती क्षेत्रे म्हटली तर विजेचे प्रमाण आणि तिचा वाढता वापर तसेच डीबीटीच्या माध्यमातून गरिबांना रोख रकमेचे हस्तांतरण करण्यात येत असल्यामुळे त्यातील भ्रष्टाचारच कमी झाला हेही मोदी यांच्या कार्याचे यशच म्हणावे लागेल... मोदी सरकारने भारताची अर्थव्यवस्था आज वाढवली आहे इतकी ती चौथ्या क्रमांकाची बनवली आहे. पण अजूनही भारतातील अकुशल आणि गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे आणि त्याच्यासाठी मोदी सरकार नोकऱ्या उपलब्ध करू शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. अजूनही भारतातील बहुसंख्य वर्ग शेतीवरच अवलंबून आहे. ही आव्हाने आहेतच पण मोदी यांचे यश निश्चित अभूतपूर्व आहे.

Comments
Add Comment

एसटीची सुधारणा करताना प्रवासी केंद्रस्थानी असावा

गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी धावायला हवी, असे गेल्या अनेक दशकांपासून राज्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या

अमेरिकेची युद्धात उडी, पुढे काय...?

इराण आणि इस्रायल यांच्या युद्धात अमेरिका उतरली आणि दुसऱ्या महायुद्धाचे स्मरण झाले. तेव्हाही जेव्हा अमेरिका

जनकल्याणाचा वसा; आणि कडवट हिंदुत्ववादी

प्रत्येक तारखेचे इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते. त्या तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींकडून घडलेले

एकनाथ शिंदे आक्रमक, उबाठा सेना हतबल

शिवसेना पक्षाचा मेळावा मुंबईत संपन्न झाला. यापूर्वी शिवसेना पक्षाचा १९ जून रोजी एकच मेळावा व्हायचा. पण एकनाथ

अरण्यातले वनऋषी

ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्यऋषी असे ज्यांना आदराने नाव दिलेले होते असे मारूती चितमपल्ली यांना वयाच्या ९३ व्या

हिंदी भाषेवरून वाद हे दुर्दैव!

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्रातील मोदी सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आला. तसे पाहायला