Tuesday, June 17, 2025

Mumbai-Goa highway : मुंबई गोवा महामार्गावरील ठेकेदारांच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिक त्रस्त

Mumbai-Goa highway : मुंबई गोवा महामार्गावरील ठेकेदारांच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिक त्रस्त

ओहोळाचे पाणी शिरले थेट नागरिकांच्या घरात


लांजा : मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम करणारे ठेकेदार कंपनी आणि अधिकारी वर्ग यांच्या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे लांजा शहरातील ओहोळातील पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेले पाणी थेट येथील नागरिकांच्या घरात शिरले आहे. लांजा श्रीरामपल येथे ही घटना घडली आहे. त्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीच्या संथपणे सुरू असलेल्या कामांचा हा नमुनाच पुढे आला आहे.

मुंबई गोवा महामार्गाची लांजा शहरात आधीच बिकट अवस्था आहे. ठिकठिकाणी महामार्गावर पडलेले खड्डे आणि मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य यातून नागरिकांना, पादचाऱ्यांना चालत जाणे एक प्रकारचे दिव्यच आहे. तर चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे देखील मोठे हाल होत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागरिक आणि वाहन चालक यांची या महामार्गामुळे अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे. साटवली फाटा ते बसस्थानक दरम्यान रोजच ट्रॅफिक जॅमची समस्या आहे.



लांजा शहरात श्रीराम पुलाचे काम मे महिन्यात हाती घेण्यात आले होते. सुरुवातीपासूनच हे काम धीम्या गतीने सुरू झाले. वास्तविक हे काम पावसाळ्यापूर्वीच किंवा मे महिन्या अगोदरच पूर्ण करणे गरजेचे होते. कारण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा एकमेव आणि महत्त्वाचा पुल आहे. मात्र याचे काम धीम्या गतीने आणि उशिरा सुरू केल्याने याचा फटका सध्या बसत आहे.


या ठिकाणी वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ओहोळाचे पाणी वाहून जाण्यासाठी एकच मोरी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या ओहोळाला आलेल्या प्रचंड पुराचे पाणी जाण्यासाठी एक मोरी अपुरी पडत असल्याने पुराचे पाणी या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात शिरत आहे. पुराच्या पाण्याचा फटका हा रोजच त्यांना सहन करावा लागत आहे.

महामार्ग ठेकेदार कंपनी आणि अधिकारी वर्ग यांच्या चालढकल आणि बेजबाबदार धोरणामुळेच लांजातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. जर वेळीच पुलाचे, सर्व्हिस रोडचे कामपूर्ण झाले असते तर आजची ही परिस्थिती निर्माण झाली नसती, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Comments
Add Comment