
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणे अशक्य
नाशिक : राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होतील आणि या सर्व निवडणुका महायुतीच लढवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधानसभेप्रमाणेच या निवडणुकांमध्येही महायुती विजयी होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री बावनकुळे नाशिकमधील महसूल आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
बावनकुळे म्हणाले निवडणुका आता कोणालाही पुढे ढकलता येणार नाहीत. पावसाळा संपताच निवडणुकीचे वारे सुरू होतील. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विधानसभेसारखा जोरदार रणसंग्राम पाहायला मिळेल. महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुका लढवणार आहोत आणि सर्व ठिकाणी आमचाच विजय होईल.
सर्वच निवडणुकांमध्ये महायुतीचे महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून येतील. मुंबईत आमचे मोठे काम सुरू आहे, त्यामुळे मुंबईचा महापौरही महायुतीचाच होईल,असे त्यांनी सांगितले.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दावे अनेक
पालकमंत्री निवडीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच यावर योग्य निर्णय घेतला जाईल. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार असल्यामुळे त्यांना पालकमंत्री पद पाहिजे आहे तर शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील नाशिकचे पालकमंत्रीपद पाहिजे आहे, त्यामुळे या वादात तूर्तास निर्णय झालेला नाही. दरम्यान भाजपने आपला दावा कायम ठेवल्याचे देखील त्यांनी सांगितले. शिवसेना (ठाकरे गट) व मनसेसोबत युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, हे दोन्ही पक्ष प्रगल्भ नेत्यांचे आहेत. योग्य निर्णय तेच घेतील. मला त्यावर बोलायचा अधिकार नाही.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर ते म्हणाले, ही घटना अतिशय गंभीर आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. सरकारनेही याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि उर्वरितही लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी दिली.