
जगावर मंदीचे सावट आहे. अनेक देशांचे संघर्ष सुरू आहेत. या संघर्षांचा अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अमेरिकेने वेगवेगळ्या देशांवर परस्पर आयात शुल्क अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ लावले आहे. काही मुद्यांवर चीन आणि युरोपियन महासंघ विरुद्ध अमेरिका असे टॅरिफ वॉर सुरू आहे. या प्रतिकूल वातावरणात भारताच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होत आहे. भारताने झपाट्याने प्रगती करत जपानला मागे टाकत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यापर्यंत मजल मारली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अर्थात आयएमएफच्या माहितीचा संदर्भ देत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणाले. भारताने जपानला मागे टाकल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विकासाची गती कायम राहिली अथवा वाढली तर पुढील दोन ते तीन वर्षात भारत जर्मनीला मागे टाकून जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केला.
याआधी शनिवार २४ मे रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी देशातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.