
नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना
नवी दिल्ली : विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचे ध्येय आहे. जेव्हा प्रत्येक राज्य विकसित असेल, तेव्हा भारत विकसित होईल. ही देशातील १४० कोटी नागरिकांची आकांक्षा आहे. भारताला विकासाचा वेग वाढवावा लागेल. जर केंद्र आणि सर्व राज्ये एकत्र येऊन टीम इंडियाप्रमाणे एकत्र काम करतील, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या गव्हर्निग काऊन्सिल विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ‘विकसित भारतासाठी विकसित राज्य @२०४७’ या विषयावर ही बैठक झाली. नीती आयोगाच्या परिषदेत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पंतप्रधानांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, उपराज्यपालांशी हा पहिलाच मोठा संवाद आहे. या बैठकीत मोदी यांनी देशाच्या विकासाची गती वाढवण्याची गरज आहे, अशी गरज व्यक्त केली. देशाच्या विकासात राज्य तसेच केंद्र सरकार यांनी एकत्र येत काम केले पाहिजे, अशी अपेक्षा मोदी यांनी या व्यक्त केली.

मुंबई पोलीस आयुक्तांचा आदेश जारी मुंबई: मुंबई पोलीस दलातील प्रत्येक शिपाईचा यापुढे सैन्यातील जवानाप्रमाणे विशेष सन्मान करण्याचा आदेश, मुंबई पोलीस ...
बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले उद्घाटनपर भाषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपराज्यपाल, प्रशासकांनी अजेंडा विषयांवर हस्तक्षेप करण्यावरील सत्राला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली. गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीच्या अजेंड्यात ‘विकसित राज्य; उद्योजकता, रोजगार, कौशल्याला प्रोत्साहन देणे; एमएसएमई रोजगार यासारख्या इतर मुद्द्यांचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकारही महाराष्ट्र २०४७ असे व्हीजन तीन टप्प्यात तयार करीत आहे. १०० दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना, उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम आमच्या सरकारने हाती घेतला. यात विविध विभागांनी ७०० हून अधिक उद्दिष्ट साध्य केले. २०२४-२५ या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक १.३९ लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. दावोसमध्ये १५.९६ लाख कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातील ५० टक्के प्रस्तावांवर प्रक्रिया सुरू झाली असून, त्यातील अधिकाधिक गुंतवणूक ही दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये होत आहे. विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा, विविध सुधारणा आणि रोजगार वाढविण्यावर आमचा भर आहे. समृद्धी महामार्ग, अटलसेतू, कोस्टर रोड आदी प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला आणि पायाभूत क्षेत्रातील क्रांतीला गती देत आहेत. वाढवण पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, रेल्वे, मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क हे क्षेत्रीय विकासाला चालना देणार असून, त्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले.