Saturday, May 24, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

आला रे मान्सून आला, राज्यात कधी बरसणार ?

आला रे मान्सून आला, राज्यात कधी बरसणार ?
नवी दिल्ली : उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. यंदा मे महिन्यात मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये लवकर आगमन झाल्यामुळे महाराष्ट्रातही पाऊस लवकर येण्याची शक्यता आहे. मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू राहिला तर राज्यात आठवड्याभरात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.



मागील दोन चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शहरी भागांमध्ये उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. पण शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मान्सून आता केरळात दाखल झालाय. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात केव्हा बरसणार आहेत याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये वळवाचा पाऊस सुरु आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला आहे.

केरळात दाखल झालेला मान्सून हा दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर या भागात पुढे सरकणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस आणि वारा यामध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज हमावान खात्याने वर्तवलाय. आता पुढील साधारण ७ ते ८ दिवसांत म्हणजेच ६ जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात पोहण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गसारख्या भागांत प्रथम पाऊस पडेल. यंदा मान्सूनच्या पावसाचं प्रमाणही सरासरीएवढं किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

मान्सूनचा प्रवास पाहता कोकणानंतर तो दहा जूनपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यंदा तर शाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सूला सुरुवात झालीय. त्यामुळे पावसातून जाताना दप्तर भिजणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे.
Comments
Add Comment