
भक्ती यांचा अथर्व यांच्याशी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या दांपत्याला पाच वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर सासरच्या लोकांकडून भक्ती यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप त्यांच्या वडिलांनी केला. काही काळ भक्ती माहेरी राहण्यास आली होती. अथर्वने समजूत काढून काही दिवसांपूर्वी भक्तीला घरी नेले होते. सासरी पोहोचताल्यावर पुन्हा एकदा सासरच्यांकडून भक्तीचा जाच करणे सुरू झाले. या जाचाला कंटाळून भक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर भक्तीच्या आई, वडिलांनी गुजराथी कुटुंबाविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. अथर्वसह त्याच्या कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रमाणेच भक्ती गुजराथीच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे भक्ती यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या घडवून ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी भक्तीच्या कुटुंबाने केली आहे. भक्तीच्या मुलाचा ताबा मिळावा यासाठीही तिचे कुटुंब आग्रही आहे.
पुणे जिल्ह्यातील हडपसरमध्येही एका विवाहितेने आत्महत्या केली. महिन्याभरापूर्वीच लग्न झालेल्या दीपा पुजारीने सासरचा जाच असह्य झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले.