
मुसळधार पावसामुळे नागरिकांना दिलासा
रत्नागिरी:मुसळधार पावसाने पाणीटंचाईवर खर्च होणारे शासनाचे लाखो रूपये वाचवले आहेत. तर दापोली, गुहागर, राजापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांनी पाणी नियोजनाचा आराखडा राबविल्याने याठिकाणी एकही टँकर लागला नाही. त्यामुळे त्यावर खर्च होणारे पैसेही वाचले आहेत.
त्याचे सर्व श्रेय तेथील ग्रामपंचायती तसेच गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीला जात असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले़ सोमवार १९ मे पर्यंत टँकरने १ हजार ३ फेऱ्यांद्वारे २६ हजार ७०९ नागरिकांना पाण्याचे वाटप केले. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक जास्त ४८ वाड्यांना पाणीटंचाई भासल्याने ७६८ फेऱ्या टँकर फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला़ त्यामध्ये सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ४७ गावातील १०८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामध्ये सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यात शासकीय एकही टँकर न लावता ८ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. तर दरवर्षी पाणीटंचाई भासणाऱ्या दापोली, गुहागर, राजापूर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला नाही. मात्र सहा तालुक्यांना शासकीय तसेच खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला़ मंडणगड तालुक्यात शासकीय टँकर नसल्याने एका टँकरद्वारे एका वाडीला पाणीपुरवठा करण्यात आला़ खेड तालुक्यात एका शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला तर चिपळूण तालुक्यात ९ गावातील १३ वाड्यांना एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला़ संगमेश्वर तालुक्यात १३ गावातील २६ वाड्यांना एक शासकीय तर २ खासगी टँकरद्वारे ५६ फेऱ्यांमधून ६,७९३ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला़ लांजा तालुक्यातील २ गावातील ३ वाड्यांना एका टँकरद्वारे फक्त १० फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ९ गावांमध्ये असणाऱ्या ४८ वाड्यांना ८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून त्यामध्ये शिरगाव गावातील ८ वाड्या, सडामिऱ्या गावातील ६ वाड्या,केळ्ये गावातील ९ वाड्या, जांभारी गावातील १० वाड्यांचा समावेश आहे़