
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यातच अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशात अद्याप नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदीला सुरुवात केलेली नाही. नाफेडने थेट बाजार समितीमधून कांद्याची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या ७०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल असा नीचांकी भाव मिळत आहे.
या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. २०२३-२४ च्या हंगामात नाशिक जिल्ह्यात कांद्याची लागवड झाली होती. या हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात देखील कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती. सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढणी पूर्ण केली आहे. परंतु, कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. त्यातच अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने बफर स्टॉकसाठी नाफेड आणि एनसीसीएफमार्फत प्रत्येकी दीड लाख टन म्हणजे एकूण तीन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे, मात्र, ही खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
बांगलादेशात निर्यात घटली
सध्या कांदा निर्यातीवर सरकारकडून कुठलेही बंधन नसतानाही कांद्याची निर्यात संथ गतीने होत आहे. भारतातून सर्वात जास्त कांदा निर्यात होणाऱ्या बांगलादेशात स्थानिक कांदा सुरू असल्याने तिथे भारतीय कांद्याची मागणी कमी आहे. कांद्याला येणाऱ्या काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. परंतु, अवकाळी पावसामुळे चाळीतील कांदा भिजल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
बळीराजाला सावरण्याची गरज
कांदा निर्यात जास्तीत जास्त व्हावी, यासाठी सरकारी उपाययोजना यावरच दरवाढीचे भवितव्य अवलंबून आहे. तसेच नाफेडने थेट बाजार समितीमार्फत कांदा खरेदी सुरू करावी. नाफेडच्या कांदा खरेदीतील व्यवहारात पारदर्शकता असावी. कांद्याला भाव कमी मिळत असल्याने बळीराजाला सावरण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे.