
मुंबई :मुंबईमध्ये वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून पहाटे आणि रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाळ्यात डोंगरावरून दरड कोसळणे, पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईमधील डोंगराळ भागात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईमधील विक्रोळी पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या ठिकाणी डोंगराळ परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपड्या उभारण्यात आल्या असून या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने रहिवासी वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे डोंगराळ भागात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, एन विभाग कार्यालयाने वरील ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच दिल्या आहेत. तरीही स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर तेथे वास्तव्य करावे.
नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्तांनी कळविले आहे. पावसाळ्यादरम्यान दरडी कोसळण्याची, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची, तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात.