
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात रस्त्यांची अवस्था खूपच केविलवाणी झाली आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर जणू पाण्याचे तळेच निर्माण झालेले आहे. काही रस्ते चिखलमय झाल्याने छोटे मोठ्या अपघातांचे सत्र सुरू आहे. येथील रस्त्याची अवस्था पाहता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वाहनधारकाना पडला आहे. रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गुळणी धरून बसलेले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ते गोंदे दुमाला दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. पावसाने अधिकच रस्ता खराब झाल्याने वाहनधारकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या रस्त्यावर अनेक वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते. सदर रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने वाहने सतत नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकानी केली आहे. या रस्त्याने अनेक कंपनी कामगार गोंदे दुमाला येथे जात असतात. खराब रस्त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील वाढले आहेत. अनेक जणांना मणक्याचे आजार जडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे पडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून असून अधिकारी मात्र दुर्लक्ष करताना दिसतात.