Friday, May 23, 2025

नाशिक

खरीप हंगामासाठी पैसे शिल्लक नसल्याने शेतकरी झाले हतबल

खरीप हंगामासाठी पैसे शिल्लक नसल्याने शेतकरी झाले हतबल

लक्ष्मण सोनवणे


बेलगाव कुऱ्हे : भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगाम नियोजनासाठी जमीन मशागतीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली मात्र पुढील नियोजनासाठी पैसे शिल्लक नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेतीसाठी लागणारी नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, पाबर, कोळप आदी पारंपरिक औजारे कारागिरांकडून बनवली जात होती मात्र आता त्या पद्धतीचे गावोगावी कारागीर राहिले नसल्याने शेतकरी आधुनिक यांत्रिकरणाकडे वळला आहे.


महागाईमुळे औजाराना देखील अडीच ते तीन हजार खर्च येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. काळाच्या ओघात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी अडीच ते तीन हजार भाव एकरला मोजावे लागतात. काही आदिवासी भागात शेतजमीनीची मशागत पारंपरिक पद्धतीने केली जाते. भाताचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्याच्या महसुली गावात अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात मे च्या शेवटच्या आठवड्यात खरीप हंगामाच्या जोरदार तयारीसाठी जमीन दुरुस्ती, मशागतीची कामे केली जातात. मात्र अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडे जमीन दुरुस्तीसाठी पैसेच नसल्याने हतबल झाले आहेत. अशातच बाजारात मशागतीची औजाराना मागणी वाढली असून एखाद्या योजनेची अंमलबजावणी करावी असे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून अनियमित पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतीची अनेक कामे रखडली गेली जात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात भरपूर उत्पादन होण्यासाठी ते पूर्व मशागतीची नांगरट, मोघडणीची कामे करतात मात्र शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने शेतमशागतिकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने एन वेळेला पाहू, निघेल काहीतरी मार्ग कदाचित असाच विचार शेतकरी करीत असावा असे चित्र इगतपुरी तालुक्यात पहावयास मिळत आहे.


पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. घेतलेल्या बागाईत पिकालाही कवडीमोल भाव व अवकाळीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खरीप पेरणीसाठी पैसे उपलबध नसल्याने गरीब शेतकरी सैरभैर झाला आहे. बी बियाणे कोळपणी नांगरणी करण्यासाठी शासनाने एकरी वीस हजाराची सरसकट आर्थिक मदत करावी. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करावा.
- योगेश सुरुडे, व्हाईस चेअरमन देवळे विविध कार्यकारी सोसायटी

Comments
Add Comment