
प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष, संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत
सुभाष म्हात्रे
अलिबाग : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्याच्या चुनाभट्टीपासून दूरशेत गाव व निगडावाडी, दर्गावाडी प्रधानवाडी, भेंडीची वाडी यासह अनेक आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, भविष्यात याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्यास स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पेण तालुक्यातील सांकशी किल्ल्याच्या परिसरात अनेक बेकायदेशीर दगडखाणी व खडी क्रशरचे प्लान्ट मागील चार-पाच वर्षांपासून उभे राहिले आहेत. सध्या त्यात नव्याने काही दगडखाणी व क्रशर्स प्लांटची भर पडत आहे. या प्लान्टच्या हद्दीत सुरुंग लावले जात असल्याने या स्फोटांमुळे आदिवासींच्या घरांवर दगड पडणे, घरांना हादरे बसणे यासह मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्ग ते दर्शित गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसाला जवळजवळ ३०० ते ४०० ओव्हरलोडेड अवैध अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून अनेक शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध, रोजगारासाठी जाणारे तरुण पायी किंवा दुचाकी वाहनाने प्रवास करीत असतात; परंतु जड वाहनांच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांमुळे सर्वांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर या अनेक छोटे-मोठे अपघात होऊन किरकोळ दुखापत व वाहनांचे नुकसान झाले आहे.
मागगील दहा दिवसात अवजड वाहनांमुळे तीन मोठे अपघात झाले आहेत. १२ मे २०२५ रोजी दूरशेत गावातील रहिवासी पुंडलिक हिराजी गावंड आणि प्रणित तुळशीदास गावंड हे पायी चालत असताना,डंपर चालकाचे नियंत्रण सुटून त्यांच्या अंगावर डंपर येत असताना सतर्कतेमुळे ते पटकन रस्त्याच्या बाजुला झाले, म्हणून मोठा अनर्थ टळला. १५ मे रोजी दूरशेत गावचे रहिवासी किशोर बाबुराव डंगर हे रात्रपाळी करून दुचाकीवर घरी परतत असताना चुनाभट्टी-दूरशेत फाट्यावर त्यांच्या दुचाकीवर वेगाने डंपर आला. त्यांनी दुचाकीवरून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला; परंतू दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर
नुकसान झाले.
कोणत्याही प्रकारची कार्यवाही नाही
जडवाहनांच्या वाहतुकीमुळे दूरशेत-चुनाभट्टी रस्ता मोठ्या प्रमाणात खराब होऊन रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. या वाहनांमुळे धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर पाणी मारले जात आहे, त्या पाण्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय होऊन पायी चालणाऱ्या लोकांना चिखलातून चालावे लागत आहे. या त्रासाबाबत १२ मे २०२५ रोजी पेणचे पोलीस निरीक्षक आणि १३ मे २०२५ रोजी पेणचे उपविभागीय अधिकारी पेण यांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली आहे; परंतू याबाबतीत अजून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने दूरशेत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.