
मुंबई: राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून अकरावीच्या (Online Admission Process) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपण्याचे नाव घेत नाहीय. खरं तर २१ मे पासून ऑनलाइन अकरावी (SSC results) प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र वेबसाईट मधील तांत्रिक अडचणीमुळे ती निर्धारित वेळेमध्ये सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे, ऑनलाईन अकरावी प्रवेशासाठी गेले दोन दिवस धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण संचालनालयाकडून नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश दिनांक २६ मे पासून सुरू होणार आहे.
पोर्टलची सुविधा ४ दिवस बंद
राज्यात शासनाची वेबसाईट सुरू होताच अनेक विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यात दुरुस्ती करून ही वेबसाईट चार दिवसांनी म्हणजेच २६ मे पासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे ११ वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चार दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २६ मे ते ३ जून दरम्यान आपल्या पसंतीचे कॉलेज क्रमांक निवडता येतील, त्यासोबतच संपूर्ण अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरता येणार आहे. तर, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी १० जूनला जाहीर होईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्स अप चॅनेलवर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असेही शिक्षण संचालनालयाने म्हटलं आहे.
२६ मे ते ३ जूनपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, २६ मे ते ३ जूनपर्यंत ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर, ५ जून रोजी पहिली जनरल मेरीट लिस्ट जाहीर केली जाईल. तर ६ आणि ७ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या हरकती नोंदवून तक्रार करता येणार आहे. त्यानंतर, ८ जून रोजी अंतिम जनरल मेरीट लिस्ट जाहीर केली जाईल.