
तुमच्या घरातली मूलं शाळेत जाऊन सतत चॉकलेट, चिप्स, थम्सअप, पिझ्झा खातात का? तर ही माहिती खास तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!
गेल्या काही वर्षांत, शालेय मुलांमध्ये टाईप-२ डायबेटीस म्हणजेच मधुमेहाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. पूर्वी चाळीशीनंतर दिसणारा हा आजार, आता लहान वयातच मुलांना बळी पाडतोय. यामागचं मुख्य कारण आहे अति साखर आणि प्रोसेस्ड फूडचं वाढतं सेवन. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEने एक मोठा निर्णय घेतलाय. ते त्यांच्या सर्व शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ स्थापन करत आहेत.
पूर्वी टाइप-2 मधुमेह हा आजार प्रामुख्याने प्रौढांमध्ये दिसून येत होता. परंतु, आता मुलं देखील त्याचे बळी ठरताहेत. अतिसाखर सेवन आणि बदललेली जीवनशैली याला कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलंय. जास्त गोड खाल्ल्यानं केवळ मधुमेह नव्हे तर लठ्ठपणा, दंत समस्या आणि इतर विकार देखील वाढतात. ज्याचा मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि शैक्षणिक कामगिरीवर विपरित परिणाम होतो. त्यामुळं सीबीएसईने त्यांच्या सर्व शाळांना 'शुगर बोर्ड' स्थापन करण्यास सांगितलंय.
एक अभ्यास सांगतो की, ४ ते १० वर्षांतील मुलांमध्ये १३% कॅलरीज साखरेतून मिळतात, तर ११ ते १८ वर्षांतील मुलांमध्ये १५% कॅलरीज साखरेतून मिळतात. प्रत्यक्षात मुलांच्या दररोजच्या सेवनात कॅलरीजचे हे प्रमाण फक्त ५% असावे. मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या सेवनात कॅलरीजचे प्रमाण अधिक आढळलं आहे. यामुळे केवळ मधुमेह नाही, तर लठ्ठपणा, दातांची झीज, आणि मानसिक थकव्यासारखे अनेक त्रास वाढू शकतात.
आता स्थापन केलेले शुगर बोर्ड काय करणार?
तर शाळांमध्ये चर्चासत्रे आणि कार्यशाळा घेऊन साखरेच्या दुष्परिणामांबद्दल मुलांना माहिती देण्यात येईल. साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचं प्रोत्साहन दिलं जाईल, पालक, शिक्षक आणि मुलांमध्ये जनजागृती करण्यात येईल. यामुळे आता तरी सावध व्हा – तुमच्या मुलांचं ताट काय सांगतंय, याकडे लक्ष द्या!