Friday, October 24, 2025
Happy Diwali

मुंबई-गोवा महामार्गासाठी निधी उपलब्ध करून देणार

मुंबई-गोवा महामार्गासाठी  निधी उपलब्ध करून देणार

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी दरम्यान दिले आश्वासन

अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रायगडमधील महामार्गाच्या कामाची हवाईसह प्रत्यक्ष पाहणी करून काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला, त्याचबरोबर महामार्गावरील अपूर्ण पूल, बाह्य वळणे आणि सर्विस रोडची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले, तसेच या महामार्गासंदर्भात मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन ज्या कामांसाठी निधी उपलब्ध होऊ शकत नाही, त्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

माणगावच्या आनंद भुवन सभागृहात मुंबई-गोवा महामार्ग आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून ते महाडपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचा आढावा त्यांनी घेतला. माणगाव व इंदापूर येथील वाहतूक कोंडी विषयावर सविस्तर चर्चाही करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामामध्ये होणाऱ्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली. नागरिकांना सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहॆ.

या कामांचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशही दिले. माणगाव येथील बायपास तातडीने पूर्ण होणार नाही हे खरे आहे; परंतु इंदापूर ते कशेणे कालवा रोड पर्यायी मार्ग, तसेच माणगाव शहरातील मोर्बा रोड, कालवा मार्ग ते मुंबई-गोवा महामार्ग असा पर्यायी मार्ग उपलब्ध करता येऊ शकतो. साईनगर कालवा मार्ग, भादाव ते विंचवली हा मार्ग झाल्यास कायमस्वरूपी वाहतूक कोंडीतून सुटका होईल.पर्यायी मार्गांसाठी केंद्र सरकारने मदत न केल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तत्काळ पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या अशा सुचनाही पवार यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिल्या.

इंदापूर-माणगाव बायपासचे टेंडर निघाले आहे; परंतु लोणेरे येथील महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय बायपासचे काम करणाऱ्या नवीन कंत्राटदाराला वर्कऑर्डर देता येणार नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत देताच त्यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील असेही पवार यांनी उत्तरात सांगितले. मुंबई-गोवा महामार्गालगत अनेक छोटी-मोठी गावे आहेत. तेथील नागरिक महामार्गावरून प्रवास करीत असतात. त्या नागरिकांना सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात यावे असे आदेश पावार यांनी यावेळी दिले.

खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी या महामार्गाच्या कामाच्या अनुषंगाने काही सुचना केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होत्या.

Comments
Add Comment