Sunday, June 22, 2025

PM Modi : पंतप्रधान मोदींची खेळी, एका दगडात मारले दोन पक्षी

PM Modi : पंतप्रधान मोदींची खेळी, एका दगडात मारले दोन पक्षी

आंतरराष्ट्रीय पातळीवर रणनीती, देशात वेगळीच खेळी 


भारत - पाकिस्तान युद्धाला कारणीभूत ठरला तो पहलगाम दहशतवादी हल्ला. ऑपरेशन सिंदूरद्वारे आपण दहशतवादाविरोधात आहोत हे भारताने जगाला ठणकावून सांगितलं आणि दाखवूनही दिलं. दहशतवादाविरोधात भारताने आपली भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी जे शिष्टमंडळ तयार केलं गेलं त्यात मोदी सरकारची रणनीती दिसून आलीय. मोदी सरकारने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. नेमकं कोणती रणनीती केंद्र सरकारने अर्थात मोदी सरकारने आखली ती जाणून घेऊया...


दहशतवादा विरोधातील भारताची लढाई कशी योग्य आहे आणि ऑपरेशन सिंदूर किती योग्य होतं याचं महत्त्व जागतिक पातळीवर मांडण्यासाठी भारताने ७ शिष्टमंडळं तयार केली. या शिष्टमंडळांमध्ये सर्वपक्षीयांचा समावेश करून मोदी सरकारने अंतर्गत राजकीय क्षेत्रात राजकीय स्ट्राईक केलाय. म्हणजेच दशतवादाचा बीमोड कसा महत्त्वाचा आहे हे जगाला सांगायचं आणि दुसरीकडे शिष्टमंडळांमध्ये अन्य पक्षांच्या नेत्यांचा समावेश करून ते डोकं वर काढू नयेत, असा संदेश दिलाय. भाजपा सरकारविरोधात काँग्रेस अर्थात राहुल गांधींनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतलीय. मग संसद असो की भारत जोडो यात्रा. भाजपाच्या अनेक अजेंड्यांवर त्यांनी टीका केलीय, मात्र भाजपाने यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरून यांचा शिष्टमंडळात समावेश करून काँग्रेसची हवाच काढून घेतलीय. शशी थरुर यांना निवडणूक जिंकता आली नसली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं त्यांचं वजन, महत्त्व कमी झालेलं नाही. त्यातच काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे शशी थरुर नाराज असल्याची चर्चा आहे. माझ्यासाठी अनेक दरवाजे खुले आहेत असं शशी थरूर यांनी म्हटलं होतं. याच थरुरांना शिष्टमंडळात घेत भाजपाने काँग्रेसचं तोंड बंद केलंय. केरळमधील निवडणुका लक्षात घेऊन भाजपाची ही रणनीती काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार आहे.



भाजपाने अशीच एक राजकीय खेळी केलीय ती म्हणजे कनिमोझी करुणानिधींना गप्प केलंय. कच्चाथिवू बेटाच्या वादावरून कमिमोझी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. कच्छाथिवूबद्दल बोलणं हे फक्त निवडणूक प्रचारासाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी नाही अशी टीका त्यांनी केली होती. कनिमोझी या स्पेक्ट्रम वाटपाशी संबंधित लाचखोरीच्या लाभार्थी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना २०११ मध्ये अटक करण्यात आली होती आणि नंतर २०१७ मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. याच कनिमोझी आगामी निवडणुकीत भाजपाच्या डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे मोदी सरकारने कनिमोझींचा शिष्टमंडळात समावेश करून आताच राजकीय नाकाबंदी केलीय. त्यामुळे आगामी निवडणुकीत द्रमुक भाजपाविरोधात भूमिका घेताना चार वेळा विचार करेल, एवढं निश्चित. यापेक्षा वेगळी स्थिती महाराष्ट्रात नाही.


महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आकलनापलीकडचं आहे. राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचं पंतप्रधान मोदींशी राजकीय पातळीवर सख्य आहे. मात्र पवारांनी पंतप्रधान मोदींवर अनेकदा टीका केलीय. इतकंच नव्हे तर पंतप्रधान मोदींनी पवारांवर शा‍ब्दिक वार केलेले आहे. असं असलं तरी पंतप्रधान मोदी हे शरद पवारांच्या राजकीय पटावरील खेळींना चांगलेच ओळखून आहेत. त्यातच खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय. आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करता आणि पवारांच्या डावपेचांना रोखण्यासाठी भाजपाने आत्ताच डाव टाकलाय. खासदार सुप्रिया सुळे यांचा शिष्टमंडळात समावेश केलाय. त्यांच्यावर इजिप्त, कतार, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका या देशांची जबाबदारी टाकलीय. मात्र ही जबाबदारी टाकतानाच मोदी सरकारने पवार गटाला शांत बसण्याचा सूचक इशारा दिलाय.


राज्यात सत्ताबदल झाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर खातेवाटपावरून शिवसेनेने भाजपाच्या नाकीनऊ आणले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कधी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी तर काही ठिकाणी भाजपा विरूद्ध शिवसेना यांच्यात वाद झाले. अगदी एकनाथ शिंदे याचा गड मानल्या जाणाऱ्या कल्याणमध्येच शिंदेंना शह देण्याची रणनीती भाजपने आखल्याचे आरोप झाले. मात्र शिवसेना पुन्हा पुन्हा डोकं वर काढू नये आणि डोईजड होऊ नये यासाठी मोदी सरकारने गुगली टाकली. या गुगलीत शिवसेना फसणार आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा दहशतवाविरोधी शिष्टमंडळात समावेश करण्यात आलाय. त्यांच्यावर यूएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओनी यांची जबाबदारी टाकण्यात आलीय. त्यामुळे भाजपावर टीका करताना शिवसेनेला दहा वेळा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी कमी होणार आहे.


भारत - पाकिस्तान युद्धात मध्यस्थीचा दावा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र मोदी सरकारच्या भूमिकेमुळे त्यांना हा दावा मागे घ्यावा लागला. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींची खेळी यशस्वी झाली, त्याच वेळी त्यांनी शिष्टमंडळात काँग्रेस नेते शशी थरुर, द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी, शरद पवार गटाच्या खासदास सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश करून एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. मोदी सरकारवर टीका करताना या नेत्यांना आणि नेत्यांच्या पक्षांना मोदी सरकारने विचार करायला भाग पाडलंय.


Comments
Add Comment