Saturday, June 7, 2025

‘हा वारसा देऊ शकता तुमच्या मुलांना’

‘हा वारसा देऊ शकता तुमच्या मुलांना’

आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू


'वारसा’(Inheritance) हा शब्द आपल्या कुटुंबातील मूळ आणि मुल्यांची आठवण आपल्याला करून देतो. प्रत्येक घर मुलाला काही देत असतं. मुलांना आपलं कूळ आणि मूळ माहीत असणं खूप आवश्यक असतं कारण समाजात वावरण्याच्या जाणिवा, नियम, संकेत मुलांना त्यातून कळतात. ‘वारसा’देखील तसाच. तो फक्त घर, संपत्ती, दागदागिने, नाव, प्रतिष्ठा यांचाच नसतो कारण तो तर पालकांनी किंवा मुलांनाही काही न करता सहज मिळतो. मात्र सद्गुणांचा, सदवर्तनाचा वारसा मुलांमध्ये रुजवणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. घराने मुलाला द्यायचा असतो देशप्रेमाचा, समाजसेवेचा, कलेचा, माणुसकीचा, दानशूरपणाचा वारसा. वारसा असाही असतो जो भविष्यकाळात मुलांना एक संवेदनशील, बुद्धिमान आणि उदारमतवादी नागरिक बनवतो.


पालकांनो वारसा देऊ या आणि मुलांचं व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी काय करता येईल ते पाहू या.


१. शहाणपण (Wisdom)
मुलाचं शहाणपण हे शाळेत मिळालेल्या मार्कांवरून ठरत नाही. शहाणपण जीवन जगण्यातून येत असतं. मुलांना शाळेतून नाही तर आई-वडिलांच्या शिकवण्यातून शहाणपण येत असतं. पालक हे शहाणपण शिकवण्यासाठी सगळ्यात उत्तम व्यक्ती असतात. तुमच्या मुलांचे मार्गदर्शक बना. तुमचे अनुभव त्यांच्याबरोबर शेअर करा. आयुष्याचे कठीण धडे शिकताना ट्रायल ॲन्ड एरर पद्धतीने मुलांनी शिकणं हे जोखमीचं आहे. अशावेळी तुम्ही त्यांच्या बरोबर असलात तर सजगपणे, शहाणपणाने कसं वागावं आणि तुमच्यापेक्षा त्यांनी अधिक प्रगती कशी करावी याचा वस्तूपाठ तुम्ही मुलांना देऊ शकाल.


२. सामाजिक कौशल्य
आयुष्य हे नातेसंबंधाच्या रेशीमधाग्यांनी विणलेल्या वस्त्रासारखं गुंतागुंतीचं असतं. ही नाती निर्माण करणं, जपणं, कायम करणं यासाठी सामाजिक कौशल्यं आवश्यक असतात. हा वारसा आपण मुलांना देऊ या. स्वतःला कसं सांभाळायचं ते मुलांना शिकवा. भाऊ, बहीण हे नातं कसं फुलवायचं, भिन्नलिंगी लोकांना कसं हॅन्डल करायचं. योग्य संगत कशी निवडायची ? मित्र कसे बनवायचे, मैत्री कशी टिकवायची ? लोकांशी इंटरअ‍ॅक्ट कसं करायचं? समाजात कसं जुळवून घ्यायचं, संवाद कसा करायचा ही सोशल स्किल्स शिकण्याची संधी दिली, तर मोठेपणी मुलांना त्याचा खूप फायदा होईल.


३. कुटुंबाचा निरोगी दृष्टिकोन
मुलांसमोर तुम्ही नवरा-बायको म्हणून नातं कसं असावं याचं उदाहरण घालून द्या. तुमचं वैवाहिक जीवन, प्रेम, ओढ, आदर, समजूतदारपणाचं असेल तर मुलं त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांच्या जोडीदाराशी खूप छान नातं फुलवू शकतील. एकमेकांविषयी आदराने बोललात, तर लग्नाच्या नात्यात जोडीदाराचं अस्तित्व खूप महत्त्वाचं असतं हेही मुलांना कळेल.


४. मधुर, गोड, छान आठवणी
लहानपणाच्या आठवणी मोठं झाल्यावरही आपल्याला खूप आनंद देतात. मुलांनाही त्यांच्या लहानपणाच्या आठवणी जतन करायला शिकवा. आपण असू किंवा नसू पण आपण अस्तित्वात नसलो तरी त्या आठवणींचा वारसा त्यांच्या सोबत असेल. मुलांना वाटेल की माझ्या पालकांच्या रूपाने या जगात चांगली माणसं आहेत.


५. उत्तम मानसिक आरोग्य
मुलांसाठी जर आपण दुष्ट आठवणी (trauma) वारसा म्हणून ठेवत असू, तर त्यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही . काही मुलांबाबत अशा काही गोष्टी घडलेल्या असतात जसं की काही पालक मुलांचा अपमान करतात. मुलांचं शोषण करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. सतत मुलांची दुसऱ्यांशी तुलना करतात. त्यांना नाकारतात अशा आठवणी मुलांचं मानसिक आरोग्य बिघडवतात. एक सुजाण पालक म्हणून तुम्ही मुलांना उत्तम मानसिक आरोग्याचा वारसा देऊ शकता. त्यासाठी मुलांची काळजी घ्या, त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना कुशीत घेऊन ते तुमच्याजवळ सुरक्षित आहेत असं त्यांना वाटू दे.


६. नावलौकिक
आपला समाजात असलेला नावलौकिक असा असायला हवा पालकांनो की मुलांना तुमच्या नावाचा, कुळाचा, शिक्षणाचा, प्रतिष्ठेचा, मानमरातब या सगळ्या गोष्टींचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे. आपलं नाव या कुटुंबाशी जोडलं गेलं आहे याचं मुलांना समाधान वाटलं पाहिजे. आनंद झाला पाहिजे.


७. स्व-ओळख
तुम्हीच तुमच्या मुलांच्या स्वअस्तित्वाची, स्व-ओळख मिळवण्याची गुरुकिल्ली आहात. तुम्ही त्यांना आपल्या कुटुंबाचा वंशवृक्ष (Family tree) च्या माध्यमातून हे शिकवू शकता. त्यांचे पणजोबा, पणजी, आजोबा, आजी कोण होते? काय करत होते? त्यांचे काका, काकू, मामा, मावशी, चुलत, मावस, मामे भावंडं कोण आहेत? ते काय काम करतात हे मुलांना सांगायला हवं. तुम्ही नातेवाईकांशी कसे वागता? त्यांना कसे भेटता त्यावर मुलं पुढे ही नाती कंटिन्यू करतील हे ठरतं.


८. आर्थिक संपत्ती
आई-वडील आपल्या मुलांकरिता जमेल तशी आर्थिक संपत्ती, शेअर्स, गुंतवणूक, घर, जमीन, दागिने या सारख्या स्वरूपात मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून त्यांना या गोष्टींचा पुढील आयुष्यात उपयोग होईल. त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आपण त्यांना संपत्तीचे व्यवस्थापन आणि जतन कसे करावे हेही शिकवायला हवे.


९. विश्वासाचा वारसा
देव, प्रार्थना, पूजा, संस्कार, संस्कृती, मूल्ये या गोष्टींच्या ज्ञानाचा वारसाही आपण मुलांना द्यायला हवा. आपण जेव्हा त्यांच्याजवळ नसू तेव्हा हा अध्यात्मिक वारसा त्यांना धीर देईल. मार्ग काढायला मदत करेल. त्यातूनच मुलांमध्ये एकात्मता, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा हे गुण
अंगी येतील.

Comments
Add Comment