
सोलापूर: सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका टेक्सटाईल कारखान्याला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये तब्बल 8 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार असल्याचे जाहीर केले आहे.
अक्कलकोट एमआयडीसीतील कारखान्याला लागेल्या आगीच्या धुराने अख्ख्या सोलापूरवासीयांच्या डोळ्यात पाणी आले. या दुर्घटनेत 8 निष्पापांचा जीव गेला असून त्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे.
मालकासह कुटुंबातील 5 आणि 3 कामगारांचा होरपळून मृत्यू
नरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी टेक्सटाईल कारखान्याचे मालक उस्मान मनसुरी आपल्या कुटुंबीयांसोबत वरच्या मजल्यावरील मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत कुटुंबातील 5 निष्पाप जणांचा आणि कंपनीतील तीन कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. शोधकार्य सुरु असतानच या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व आठही मृतदेह हे सर्व विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांना 5 लाख रुपयांची मदत
सोलापुरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 8 जणांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.
मृतांची नावे
सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मनसुरी (वय 87)
अनस मनसुरी (वय 24)
शीफा मनसुरी (वय24)
युसूफ मनसुरी (वय 1.6)
आयेशा बागबान (वय 38)
मेहताब बागवान (वय 51)
हिना बागवान (वय 35)
सलमान बागवान (वय 38)