महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
पुराणानुसार श्री विष्णूंचा सहावा अवतार असलेले व जन्माने ब्राह्मण; परंतु वृत्तीने क्षत्रिय असलेले परशुराम हे सात चिरंजीवांपैकी एक आहेत. चारही युगात अस्तित्व असलेले परशुराम हे कलीयुगातील कल्की या अवताराचे गुरू असतील असे मानले जाते.
एकदा भृगूपूत्र ऋचिकाकडे त्याची पत्नी सत्यवती व सासू दोघींनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. ऋचिकांनी यज्ञातून उत्पन्न केलेल्या खीरीचे दोन भाग केले, ते वेगवेगळ्या मंत्राने शिजवले व सासू व पत्नीला दिले. ऋचिकने पत्नीसाठी विशेष श्रेष्ठ खीर मंत्रावली असेल असे वाटून सत्यवतीच्या आईने आपला भाग सत्यवतीला व सत्यवतीचा भाग आपण घेतला. हे ऋचिकाला कळल्यावर आता यामुळे फार अनर्थ होईल असे सत्यवतीला सांगितले. तुला होणारा पुत्र विरवृत्तीचा होईल, तर तुझ्या आईला होणारा पुत्र तपी ज्ञानी ब्रह्मवेत्ता होईल असे सांगितले. यावर सत्यवतीने क्षमा मागून पूत्राएेवजी नातवात वीरवृत्ती असावी अशी विनंती केली. तेव्हा ऋचिकाने तसा आशीर्वाद दिला. पुढे सत्यवतीला जमदग्नी व तिच्या आईच्या पोटी विश्वामित्र जन्मले. जमदग्नीचा विवाह रेणू नावाच्या राजाच्या रेणुका नामक कन्येशी झाला. त्यांना रुक्मवान, सुषेण, वसू, विश्रावसू व राम असे पाच पुत्र होते. पैकी रामाचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला. रामाने शिवापासून विद्या ग्रहण केली. शिवाने त्यांना परशू दिला म्हणून ते परशुराम नावाने ओळखले जाऊ लागले. हैहयवंशात त्यावेळी कार्तवीर्य नावाचा राजा होता. त्याने दत्ताची उपासना केली व एक हजार बाहू व कोणापासूनही पराजित न होण्याचा वर मागितला. त्यामुळे तो सहस्त्रबाहू म्हणूनही ओळखला जाऊ लागला.
एकदा तो वनात शिकारीला गेला असता जमदग्नी ऋषींच्या आश्रमात गेला. जमदग्नी ऋषींनी त्याचे एखाद्या राजाच्या थाटात आदर सत्कार करून भोजन व्यवस्था केली. एवढ्या कमी वेळात आपण ही व्यवस्था कशी केली, असे सहस्त्रबाहुने विचारले असता त्यांने आपल्याकडे कामधेनूची मुलगी सुरभी नावाची गाय असल्याने तिच्यापासून सगळी व्यवस्था होते. हे सांगितले तेव्हा सहस्त्रबाहूनी ती गाय आपणास देण्यास सांगितले, पण जमदग्नीनी नकार देताच जबरदस्तीने त्यांनी ती गाय महिश्मतीला नेली. परशुरामाला हे कळतात तो परशु घेऊन महिश्मतीला गेला व त्यांनी प्रथम सहस्त्रबाजूचे हात तोडून नंतर शीर धडावेगळे केले. तेव्हा सहस्त्रबाहूची हजार मुले पळून गेली. परशुरामाने गाय आश्रमात परत आणली.
एकदा जमदग्नी होम हवन करण्यास बसले, असतांना त्यांनी रेणूकेला नदीवरून पाणी आणण्यास सांगितले. ती नदीवर पाणी आणण्यास गेली असता त्या ठिकाणी चित्ररथ नावाचा गंधर्व अप्सरांसोबत जल क्रीडा करत होता. ते पाहण्यात ती गुंग झाल्याने तिला उशीर झाला. तिच्या उशिराचे कारण म्हणजे तिच्यात निर्माण झालेला मानसिक व्यभिचार होता, हे जमदग्नीला कळताच त्यांनी आपल्या चारही मुलांना तिचा शिरच्छेद करण्यास सांगितले. मात्र त्यापैकी कोणीही हे कृत्य करण्यास धजावले नाही. तेव्हा त्यांनी परशुरामाला रेणुकेचे शीर उडवण्यास व बंधूंनाही ठार मारण्यास सांगितले, परशुरामाने पित्याच्या आज्ञेचे पालन केले. त्यामुळे जमदग्नी प्रसन्न झाले, व त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने प्रथम मातेला व भावांना जिवंत करा आणि त्यांना मी ठार केले या घटनेबद्दल कोणतीही जाणीव असू नये असा वर मागीतला. थोड्याच वेळात ते सर्वजण झोपेतून उठल्याप्रमाणे जागे झाले.
परशुरामाने आपल्या पित्याचा वध केल्यामुळे कार्तविर्यार्जूनाची हजार मुले चिडून होती. एकदा परशुराम आश्रमात नसल्याचे पाहून ती हजार मुले जमदग्नीच्या आश्रमात गेली व त्यांनी जमदग्नीची हत्या करून त्यांचे शीर कापून स्वतःसोबत घेवून गेले. हे पाहून रेणुका धाय मोकलून रडू लागली. तिचा आक्रोश परशुरामाला कळताच परशुराम त्वरीत आश्रमात आले. त्यांनी प्रथम कार्तविर्यार्जूनाच्या हजारही पुत्रांचा वध केला व आपल्या पित्याचे शीर आणून पित्याला जीवंत केले. पित्याच्या अंगावर २१ घाव झाल्याने परशुरामाने २१ वेळा पृथ्वीवरून केवळ सत्तांध आणि उन्मत झालेल्या क्षत्रियांचाच नाश केला. त्यानंतर परशुरामाने एक यज्ञ करून भगवंतांचे चिंतन केले व जिंकलेली संपूर्ण भूमी यज्ञाचे पौरोहित्य करणाऱ्या कश्यप ऋषींना दान केली. दान केलेल्या जागेवर राहायचे नाही, म्हणून परशुराम दक्षिणेकडे महेंद्र पर्वतावर जाऊन राहू लागले. तेथे त्यांनी आपल्या परशुच्या साह्याने सागराचे पाणी हटवून सागराकडून भूमी मिळविली व आपल्यासोबत आलेल्या ब्राह्मणांना त्या ठिकाणी वसविले. म्हणून कोकणपासून तर केरळपर्यंतच्या भूमीला परशुरामाची भूमी म्हणून ओळखले जाते.