
प्रगतीचा जलाशय : देहरजी प्रकल्प ८० टक्के पूर्ण
कोकणातील जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाने पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत माती व दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी ९३.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केआयडीसी व एममएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारानुसार एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. केआयडीसीने २७ जुलै, २००६ रोजी मे. पीव्हीआर प्रोजेक्ट्स लि. यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला आणि या धरणाद्वारे व्यापक पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीचा सखोल प्रकल्प अहवाल एमएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
देहरजी नदीवर माती आणि दगडांचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित धरणाची एकूण साठवणूक क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर आहे.
वापरण्यास उपलब्ध साठवण क्षमता: ९३.५५ दशलक्ष घनमीटर (२५५ दशलक्ष लिटर प्रतिदिन).
धरणाची लांबी: २४५० मीटर; उंची: ७१.६० मीटर.
धरणाचा प्रकार: गेटेड स्पिलवे असलेले मातीचे धरण.
स्पिलवे गेट्सचा आकार : १२ मीटर x ६.५ मीटर (४ गेट्स).
प्रकल्पाची सद्यस्थिती :
मे, २०२५ मध्ये देहरजी मध्यम प्रकल्प सुमारे ८०% पूर्ण झाला आहे.
२०२७ च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या देहरजी मध्यम प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या जलसाठ्याच्या वापरासाठी व्यापक पाणीपुरवठा योजनेचा सखोल प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली सर्वेक्षण आणि इतर क्षेत्रकार्य प्रगतीपथावर आहे.

विशिष्ट परिस्थितीत वेग मर्यादा किंचित वाढल्यास दंड वसुलीत शिथिलता देण्याची महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती ...
प्रकल्पाचे फायदे :
देहरजी धरणामुळे ९३.५५ दशलक्ष घनमीटर (प्रतिदिन २५५ दशलक्ष लिटर) पाण्याची साठवण क्षमता उपलब्ध होईल. यापैकी :
वसई-विरार महानगरपालिकेसाठी १९० एमएलडी पाणी राखीव आहे.
पाणी पुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी १५ एमएलडी पाणी.
सिडको पालघर क्षेत्रासाठी ५० एमएलडी.
पाणी वापराची प्रस्तावित क्षेत्रे :
वसई-विरार महानगरपालिका
सिडको
पालघर जिल्हा परिषद
देहरजी मध्यम प्रकल्पामुळे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे, शाश्वत व दीर्घकालीन पाणीपुरवठा सुनिश्चित करणाऱ्या जलस्रोत व्यवस्थापनामुळे कोकण भागातील सामाजिक-आर्थिक वाढीला मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देहरजी मध्यम प्रकल्प हा मूलभूत पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या आणि राज्यात दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या अजेंड्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. शाश्वत, उच्च-क्षमता असलेल्या या धरणामुळे पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी थेट मदत होईल आणि पालघर तसेच आजुबाजूच्या भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल. हा महत्त्वाचा उपक्रम वेळेवर आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आणि केआयडीसी यांच्या संयुक्त प्रयत्नांचे मी कौतुक करतो."
उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले, देहरजी मध्यम प्रकल्प हा जलसुरक्षा वाढवण्याच्या आणि ग्रामीण पायाभूत सुविधा भक्कम करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या व्यापक दृष्टिकोनातील एक प्रमुख उपक्रम आहे. एमएमआरडीए आणि केआयडीसी यांच्यातील धोरणात्मक सहयोगातून दीर्घकालिक, शाश्वत पिण्याचे पाणी पुरवठा उपाययोजना राबविण्याची आमची बांधिलकी अधोरेखित होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वसई-विरार आणि आसपासच्या भागांमधील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्यामुळे या भागातील जीवनमानातही लक्षणीय सुधारणा होईल आणि संपूर्ण भागातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) म्हणाले; “कोकण क्षेत्रातील जलसिंचन सुविधांना बळकटी देण्यासाठी देहरजी मध्यम प्रकल्प हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ९३.२२ दशलक्ष घनमीटर पिण्याच्या पाण्याच्या साठवण क्षमतेसाठी डिझाइन केलेला हा प्रकल्प म्हणजे पाण्याच्या संदर्भातील स्थानिक आव्हानांवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने सक्रियपणे केलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. एमएमआरडीएतर्फे या क्षेत्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला मदत करण्यासाठी सूर्या प्रकल्पासोबतच, एक सखोल जलपुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. पर्यावरपूरकतेवर लक्ष केंद्रीत करत एमएमआरडीएतर्फे पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण करण्यात येत आहेच, त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालिक गरजा पूर्ण करत, एमएमआरडीएतर्फे या भागातील पिण्याच्या पाण्याची सध्याची मागणी पूर्ण करण्यात येत आहेच, त्याचप्रमाणे दीर्घकालीन विचार करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. आम्ही या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वचनबद्ध आहोत, जेणेकरून या ठिकाणीच्या पर्यावरणाला आणि या क्षेत्रातील समुदायांना दीर्घकालीन लाभ मिळेल."