
वॉशिंग्टन / दोहा : "मी थेट शांती करार केला असं म्हणणार नाही, पण मदत केली हे नक्की!", अशी 'हाफ-मेडिएशन' (पूर्ण श्रेय न घेता हातभार लावल्याचा दावा) कबुली देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धविरामावरचा आपला आधीचा थेट दावा आता सौम्य केला आहे.
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला होता. यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांनी अचानक युद्धविराम जाहीर केला. त्यावर लगेचच ट्रम्प यांनी Truth Social वर पोस्ट करून, “आम्ही मध्यस्थी केली, रात्री उशिरापर्यंत चर्चा करून युद्धविराम घडवून आणला” असा दावा केला होता.
पण गुरुवारी कतारमध्ये अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांपुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, "मी केलं असं म्हणणार नाही, पण मी निश्चितच मदत केली. पाकिस्तान आणि भारत एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागू लागले होते, आणि आम्ही तो तणाव शमवला."
इतकंच नव्हे, तर ट्रम्प यांनी असंही म्हटलं की, “मी दोन्ही देशांना व्यापार करूया, युद्ध नको, असं सुचवलं. पाकिस्तान आनंदी झाला, भारतही समाधानी झाला, आणि आता दोघंही शांततेच्या दिशेने आहेत.”
मात्र, भारत सरकारने ट्रम्प यांच्या या दाव्यांचे स्पष्ट खंडन केले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले की, “भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम हा केवळ लष्करी अधिकाऱ्यांच्या थेट चर्चेतूनच शक्य झाला. अमेरिकेची मध्यस्थी, व्यापाराची धमकी किंवा हस्तक्षेप याचा यात काहीही संबंध नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा आपल्या भाषणात स्पष्ट केले की, "पाकिस्तानसोबत केवळ दोनच विषयांवर चर्चा होईल – दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरची परतफेड."
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही ट्रम्प यांच्या दाव्यांना फेटाळत म्हटले की, "भारताची पाकिस्तानशी चर्चा ही केवळ द्विपक्षीय असेल, कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही."