
पहलगाम हल्ल्यानंतर चुकून सीमेपार गेलेल्या बीएसएफ जवानाची २० दिवसांनी सुटका
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २३ एप्रिल रोजी एलओसीवर तैनात असलेले जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे, पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले होते. ज्यांची आज, बुधवारी सुटका करण्यात आली. तब्बल तीन आठवड्यानंतर अटारी बॉर्डरवर पाकिस्तानने जवान पूर्णम कुमार शॉ यांचा ताबा भारताकडे सोपविला.
बीएसएफने या संदर्भात निवेदनाद्वारे सदर माहिती दिली आहे. “पाकिस्तानी रेंजर्सनी २३ एप्रिल २०२५ रोजी ताब्यात घेतलेल्या जवान पूर्णम कुमार शॉ यांना भारताच्या स्वाधीन केले आहे. अमृतसरमधील अटारी पोस्ट येथे आज सकाळी १०.३० वाजता त्यांना सोडण्यात आले. बीएसएफ जवानाचे हस्तांतर अतिशय शांततापूर्ण आणि प्रोटोकॉलनुसार पार पडले.”
सैनिक किंवा नागरिकांकडून चुकून सीमा ओलांडणे असामान्य नाही आणि अशा बाबी सहसा मान्य केलेल्या लष्करी प्रक्रियेद्वारे सोडवल्या जातात. अशा प्रकरणांमध्ये, दोन्ही राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांमधील औपचारिक बैठकीनंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना परत पाठवले जाते.
७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या लष्करी कारवाया थांबवण्याचा "समंजसपणा" केल्याच्या काही दिवसांनी शॉ यांना सुखरूप पाठवले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
४० वर्षीय पूर्णम शॉ यांनी २३ एप्रिल रोजी शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडली होती. पूर्णम शॉ अनवधानाने पाकिस्तानी हद्दीत गेले आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर, ऑपरेशन सिंदूर, आणि भारत पाक लष्करी कारवायांमुळे दोन्ही देशांत तणाव वाढत गेला. मात्र १० मे रोजी झालेल्या शस्त्रसंधीनंतर, चार दिवसांनी शॉ यांची सुटका करण्यात आली.
तब्बल २० दिवस BSF जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होते. ज्यांची आज सुखरूप सुटका करण्यात आली. शॉ हे पंजाबमधील फिरोजपूर सीमेवर बीएसएफच्या १८२ व्या बटालियनमध्ये तैनात आहेत.