
नवी दिल्ली: बलुचिस्तानमध्ये (Balochistan) बंडाचे वारे वेगाने वाहत असून, पाकिस्तानातील नैऋत्येकडील प्रांतात स्वातंत्र्याच्या जयघोषाने जोर धरला आहे. असे असताना पाकिस्तान या भागातून आपली पकड हळूहळू गमावत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच बंडखोर लेखक मीर यार बलोच यांच्या स्वातंत्र्याच्या घोषणेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. आज सकाळी मीर यांनी बलुचिस्तान स्वातंत्र्य झाल्याची घोषणा करत, त्याचा पाक स्वतंत्र नकाशा आणि ध्वज सोशल मिडियावर प्रदर्शित केला. ज्यामुळे पाकिस्तानचे लवकरच अधिकृतरित्या दोन तुकडे पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा हे पाकिस्तानमधील नववे सर्वात मोठे शहर आहे, त्यामुळे पाकिस्तानपासून हा प्रांत वेगळा झाला तर पाकिस्तानच्या भौगोलिक अस्तीत्वामध्ये देखील त्याचा मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे.
बलुचिस्तानमध्ये पूर्वीपासूनच पाकिस्तानला कडाडून विरोध होता. पण जबरदस्तीने हा भाग पाकिस्तानमध्ये सामावून घेण्यात आला. तेव्हापासून पाकिस्तानविरोधात येथील लोकांचा स्वातंत्र्य लढा सुरू आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराने स्थानिक जनतेवर अमानुष अत्याचार केले आहेत. महिलांवर बलात्कार केले आहेत. अनेक बलुच नेत्यांना ठार केले आहे. त्याचा बदला हे लोक घेत आहेत. भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला, तेव्हा बलुच लोकांनी आनंदोत्सव साजरा केला होता.
बलुचिस्तानच्या लोकशाही स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे आवाहन
पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील प्रसिद्ध लेखक मीर यार बलोच यांनी एक्सपोस्टमध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. दहशतवादी पाकिस्तान विध्वंसाच्या जवळ आली असल्याने लवकरच संभाव्य घोषणा करायला हवी, असे ते म्हणाले. त्यांनी भारताला बलुचिस्तानला दिल्लीत अधिकृत कार्यालय आणि दूतावास सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. तसेच संयुक्त राष्ट्रांना बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे आणि पाठिंबा देण्यासाठी सर्व संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांची बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांनी ताबडतोब बलुचिस्तानमध्ये शांतीसेना पाठवावी आणि पाकिस्तानच्या ताब्यातील बलुचिस्तानचे प्रदेश, हवाई क्षेत्र आणि समुद्र रिकामे करण्यास, तसेच सर्व शस्त्रे आणि मालमत्ता बलुचिस्तानमध्ये सोडण्यास सांगायला हवे. त्याचप्रमाणे बलुचिस्तानचे नियंत्रण लवकरच स्वतंत्र बलुचिस्तान राज्याच्या नवीन सरकारकडे सोपवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
स्थानिक हिंदूंना संरक्षण
बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू समुदायावर याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक हिंदू आणि हिंगलाज माता मंदिरासह, हिंदूची सर्व धार्मिक स्थळे पाकिस्तानी सैन्याच्या दहशतवाद आणि आक्रमणापासून संरक्षित केली जाणार असल्याची ग्वाही मीर यांनी दिली. बलुचिस्तान पाकिस्तानच्या भित्र्या सैन्याला ईतका मोठा धडा शिकवण्यास सक्षम आहे की त्यांच्या सात पिढ्या ते कधीही विसरणार नाहीत. आता बलुचिस्तानमधील कोणताही पाकिस्तानी हिंदूला कलमा म्हणण्यास सांगून त्याच्या पत्नी आणि मुलांसमोर त्याला मारण्याची हिंमत करणार नाही. असेही त्यांनी पुढे म्हंटले आहे.