
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानात एक वेगळाच गोंधळ सुरू झाला आहे. सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे की भारताने पाकिस्तानच्या संवेदनशील अण्वस्त्र साठ्यावर हल्ला केला आणि त्यानंतर तिथे न्यूक्लिअर रेडिएशन लीक झालं आहे. ही माहिती अजून अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नसली तरी अमेरिकेनेही या चर्चेकडे दुर्लक्ष केलेलं नाही.
१० मे रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील ८ पेक्षा अधिक एअरबेसवर लक्ष केंद्रीत करून जोरदार हवाई कारवाई केली. यात सरगोधा, नूर खान, पसरूर, सियालकोट, रहीम यार खान, रडार सेंटर, कमांड अँड कंट्रोल युनिट यांचा समावेश होता. सॅटेलाईट फोटोंवरून या हल्ल्यांचं प्रमाण स्पष्टपणे दिसून येतंय.

पहलगाम हल्ल्यानंतर चुकून सीमेपार गेलेल्या बीएसएफ जवानाची २० दिवसांनी सुटका नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २३ एप्रिल रोजी ...
मात्र या कारवाईनंतर सर्वाधिक चर्चेत आलं ते म्हणजे किराणा हिल्स. हा भाग पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यासाठी प्रसिद्ध असून, हाच परिसर भारताच्या हल्ल्याचं लक्ष्य ठरला, असा सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे. यातूनच तिथे अणु किरणोत्सर्ग झाला असल्याचंही बोललं जातंय.
या चर्चेनंतर अमेरिकेने रेडिएशन डिटेक्शन विमान पाकिस्तानमध्ये पाठवलं असल्याचंही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आलं. मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या संपूर्ण प्रकरणावर सध्या कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
भारतीय वायुदलाचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत या दाव्यांना फेटाळून लावलं. "किराणा हिल्समध्ये अण्वस्त्र आहेत हे सांगितल्याबद्दल पाकिस्तानचे आभार," असं ते मिश्कीलपणे म्हणाले. "आम्हाला याची आधी कल्पना नव्हती."
विशेष म्हणजे, पाकिस्तानकडूनही अद्याप आंतरराष्ट्रीय अणु संस्थेकडे कुठल्याही प्रकारची चौकशी मागवलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेली रेडिएशन लीकची चर्चा अफवाच असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाच्या सुरक्षेवर नेहमी प्रश्नचिन्ह असले तरी यावेळी या चर्चेने पुन्हा एकदा जागतिक लक्ष तिकडे वळवले आहे. भारताच्या शांततेच्या संदेशामागे लपलेली सामर्थ्याची ताकद पुन्हा एकदा जगासमोर ठसठशीतपणे उभी राहिली आहे.