
ज्या कलाकारांनी अरुण पौडवाल यांच्यासोबत काम केले आहे अशा कलावंतांचा या पुरस्कारासाठी प्राधान्याने विचार केला जातो. जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी अरुण पौडवाल यांच्यासोबत खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत असल्याचे अनुराधा पौडवाल म्हणाल्या.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर म्हणाल्या, "हा पुरस्कार मी अतिशय जबाबदारीने आणि नम्रतेने स्वीकारते, माझ्यासाठी हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे. ते अनिल - अरुण या जोडीने संगीत देत होते तेव्हाही व त्यानंतर स्वतंत्र झाल्यावरही मी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्यासोबत काम करताना समृद्ध करणारा दीर्घ अनुभव मला आला आहे. आपल्या घरात अत्यंत प्रतिभावंत आणि लोकप्रिय गायिका असतानाही त्यांनी माझा एका ड्युएट गाण्यासाठी गायिका म्हणून विचार केला, मात्र निर्मात्यांच्या आग्रहामुळे मला ते गाणे देता येत नाही ही खंत त्यांनी बोलून दाखविली, असं सांगण्यासाठीही फार मोठं मन लागतं. अरुणजी हे अफाट कलागुण असलेले महान संगीतकार होते. आज अनुराधा यांच्याकडून त्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारताना अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे."
पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईत अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानी झाला. या प्रसंगी उत्तरा केळकर यांनी 'माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली' हे अप्रतिम भक्तिगीत सादर केले. याप्रसंगी 'अशी ही बनवाबनावी' मधील गीतकार सुधीर मोघे लिखित व संगीतकार अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेले व अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर यांनी गायलेलं 'कोणी तरी येणार येणार गं' या गीताच्या आठवणींद्वारे जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन चंद्रशेखर महामुनी यांनी केले.