Tuesday, May 13, 2025

देशमहत्वाची बातमी

Operation Sindoor: भाजपची आज देशभरात 'तिरंगा यात्रा', सैन्याची शौर्यगाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार

Operation Sindoor: भाजपची आज देशभरात 'तिरंगा यात्रा', सैन्याची शौर्यगाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार

मुंबई: पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी आणि पाकिस्तानच्या दहशतवादविरुद्धच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराची 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) ची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मोदी सरकार आज संपूर्ण देशभरात तिरंगा यात्रा (Tiraga Yatra) काढणार आहे.


ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी, विविध चर्चासत्रे आणि पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत.



भाजपाची आजपासून देशभरात १३ दिवसांसाठी तिरंगा यात्रा 


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणि सैन्याच्या शौर्याची गाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप दि. १३ मे ते २३ मेपर्यंत ११ दिवसांची देशव्यापी तिरंगा यात्रा आयोजित करणार आहे.


मोहिमेदरम्यान, विविध पातळ्यांवर जनतेशी थेट संवाद साधून विरोधकांच्या हल्ल्यांना उत्तर देण्याबरोबरच, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या लष्करी कारवाईचे देशासमोर सादरीकरण केले जाईल.



चुकीची माहिती रोखण्यासाठी खास मोहीम


अचानक झालेल्या शस्त्रसंधीमुळे सोशल मीडियावर सरकारविरोधी वाढते हल्ले आणि विरोधकांकडून आक्रमक प्रचार सुरू झाले आहेत, त्यामुळे जनतेसमोर कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पोहोचू नये म्हणून देशव्यापी तिरंगा यात्रेचे आयोजन केले जात आहे.


रविवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर, सोमवारी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी सरचिटणीस आणि वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या मॅरथॉन बैठकीत या मोहिमेची आखणी करण्यात आली.  या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, पीयूष गोयल, मनोहर लाल खट्टर, किरेन रिजिजू, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव उपस्थित होते.


पक्षातील एका अधिकृत सूत्राद्वारे सांगण्यात आले की, ज्या पद्धतीने अचानक शस्त्रबंदीची घोषणा करण्यात आली आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामार्फत त्याची माहिती जगाला देण्यात आली.  त्यामुळे भाजपाच्या अनेक मतदात्यांची निराशा झाली आहे. ही निराशा दूर करण्याचे मोठे आव्हान मोदीसरकारवर आहे. सोमवारी पंतप्रधानांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणानंतर या परिस्थितीत बदल होण्याची आशा पक्षाला आहे, असे सूत्रांनी सांगितले. शस्त्रबंदीच्या निर्णयात कोणताही तिसरा पक्ष सहभागी नव्हता आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदी सरकारने दहशतवादाविरुद्धचे मोठे युद्ध जिंकले असल्याची माहिती या मोहिमेअंतर्गत जनतेसमोर मांडण्याचा उद्देश भाजपाचा आहे.



ऑपरेशन सिंदूरचे प्रमुख उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचवणार


ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट सीमापार दहशतवादाला थेट आणि जोरदार प्रत्युत्तर देणे हा आहे. या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्यालाही मोठे यश मिळाले. शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले. तसेच पाकिस्तानच्या चिथावणीखोर कृत्यांनाही योग्य उत्तर देण्यात आले. ही लढाई दहशतवादाविरुद्ध होती, पण लोकांचा असा समज झाला की, भारत पाकिस्तानशी युद्ध लढत आहे. त्यामुळे जेव्हा लष्करी कारवाया थांबविण्यासाठी शस्त्र संधीची घोषणा झाली तेव्हा लोकांची निराशा झाली. त्यामुळे, लोकांची निराशा आणि ऑपरेशन सिंदूरबाबत झालेला गैरसमझ दूर करण्यासाठी देशव्यापी तिरंगा यात्रा काढली जाणार आहे.

Comments
Add Comment