
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. या वर्षी १५ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.
माध्यमिक शालांत परीक्षा एकून ६२ विषयांसाठी घेण्यात आली होती त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यात ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त आणि ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवून ४ लाख ९७ हजार २७७ जण उतीर्ण झाले आहेत. राज्यात ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत म्हणजे ४५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पण ६० टक्यांपेक्षा कमी गुण मिळवून उत्तीर्ण झाले. एकूण ८६ हजार ६४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची संधी आहे. यंदा फेरपरीक्षेचा अर्ज १५ मे २०२५ पासून भरण्यास सुरुवात होईल आणि परीक्षा २४ जूनपासून सुरु होईल.
निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in आणि results.digilocker.gov.in. या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून बघता येईल.
विभागनिहाय कामगिरी
कोकण: ९८.८२ टक्के
कोल्हापूर: ९६.८७ टक्के
मुंबई: ९५.८४ टक्के
पुणे: ९४.८१ टक्के
नाशिक: ९३.०४ टक्के
अमरावती: ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२.८२ टक्के
लातूर: ९२.७७ टक्के
नागपूर: ९०.७८ टक्के