
मुंबई: इंग्रजी माध्यमाचे वाढतं प्रस्थ लक्षात घेता, मुंबईतल्या एकूण १०० मराठी शाळा (Marathi School Closed) बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मराठी माध्यमाच्या, महानगरपालिका शाळांसाठी हा चांगला अहवाल कार्ड नाही.
मुंबईत इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे, गेल्या दहा वर्षात, तब्बल १०० हून अधिक मराठी शाळा बंद पडल्या आहेत. त्यांपैकी ४० शाळा गेल्या सहा वर्षातच बंद झाल्या आहेत. शिवाय या काळात, मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ५० हजार हून घटली असल्याचं निदर्शनास आलं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आणि युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (UDISE) ला सादर केलेल्या आकडेवारीवरून, मराठी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सतत घट होत असल्याचे दिसून आले. २०१४-१५ शैक्षणिक वर्षात, एकट्या BMC ने ३६८ मराठी माध्यमाच्या शाळा चालवल्या. आता ही संख्या २६२ वर पोहोचली आहे. या अहवालानुसार एका दशकात १०० हून अधिक मराठी शाळा बंद झाल्या आहेत.
दक्षिण मुंबईत मराठी शाळांची दयनीय अवस्था
दक्षिण मुंबईत मराठी शाळांची संख्या झपाट्याने कमी होत आहेत. २०१९ ते २०२५ दरम्यान या विभागातील तब्बल २० मराठी शाळांना टाळं लागलं आहे. दादरच्या नाबर गुरुजी विद्यालयाच्या अलीकडच्या घटनेमुळे, मराठी शाळेच्या अस्तित्वाच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. या शाळेत सध्या इयत्ता ६ वी ते १० वी पर्यन्त फक्त १८ च विद्यार्थी आहेत, व्यवस्थापनाने शेवटचा विद्यार्थी १० वी पूर्ण करेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी शाळांमधील कमकुवत पायाभूत सुविधा
अनेक शिक्षक आणि पालक म्हणतात की या बदलाचे एक मुख्य कारण म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांमधील कमकुवत पायाभूत सुविधा. याउलट, खाजगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, अगदी काही अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, चांगल्या भौतिक सुविधा, वातानुकूलित वर्गखोल्या, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा आणि आधुनिक इमारती देतात ज्यामुळे चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्याचे दिसून येते.