
मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता या दोन्ही देशात युद्धविराम झाल्यानंतर पुन्हा आयपीएल सामने सुरू होण्याचा विचार सुरू झाला आहे.BCCI ने आयपीएलला स्थगिती दिल्याने बरेच परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतले आहेत. त्यामुळे या सामन्यासाठी अनेक परदेशी खेळाडूंच्या परतण्यावर आता प्रश्नचिन्ह आहे.त्यात बहुतांश ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू जर परतले नाहीत तर बीसीसीआयकडून त्यांच्याविरोधात कठोर निर्णय घेतला जाईलं.
आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा असताना ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा परतण्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. मिडिया रिपोर्टनुसार, स्टार्कच्या मॅनेजरने याचे संकेत दिले आहेत की तो कदाचित भारतात परतणार नाही. याचप्रकारे खांद्याच्या दुखापतीमुळे जोश हेजलवुड याच्याही परतण्याची शक्यता कमी आहे. पॅट कमिंस, ट्रेविस हेड यांचीही हीच परिस्थिती आहे. आयपीएलमध्ये न परतण्यामागे WTC फायनलचेही कारण दिसून येते. ११ जूनपासून हे सामने सुरू होत आहेत त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम ६ जूनला इंग्लंडला पोहचेल. ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनला त्यांचे महत्त्वाचे खेळाडू आयपीएल सामन्यांमुळे अनफिट आणि दुखापतग्रस्त व्हावेत असं वाटत नाही.
दरम्यान, IPL 2025 पुन्हा एकदा १६ मे पासून सुरू करण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. भारत सरकारनेही त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्याशिवाय आयपीएल सीरिज ३० मे पर्यंत वाढवण्याची चर्चा आहे. आयपीएलमध्ये अजून १७ सामने खेळणे बाकी आहे. ज्यात १३ ग्रुप स्टेज मॅच आहेत. या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू आले तर ठीक आहे परंतु जर ते परतले नाहीत तर बीसीसीआय त्यांच्याविरोधात कठोर निर्णय घेत त्यांच्यावर २ वर्ष बंदी आणू शकते.
आयपीएल २०२५ पासून बीसीसीआयनं अशा खेळाडूंसाठी नवीन नियम बनवले आहेत जे मध्ये सामने सोडून त्यांच्या देशात परतात किंवा कुठल्या तरी बहाण्याने सामने स्कीप करतात. यावेळी या परदेशी खेळाडूंवर बीसीसीआयने कठोर पावले उचलली आहेत. या खेळाडूंना बीसीसीआयने आयपीएलमध्ये २ वर्षाची बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. BCCI ने या नियमाचा वापर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवर केला आहे. आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंवरही अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे.