Monday, May 12, 2025

रायगड

अवकाळी पावसामुळे महाड-म्हाप्रळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

अवकाळी पावसामुळे महाड-म्हाप्रळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

महाड खाडीपट्ट्यातील रस्ता वाहतुकीसाठी बंद


महाड : महाड तालुक्यातील म्हाप्रळ-पंढरपूर या मार्गावरील महाड ते म्हाप्रळ या मार्गावरील काम गेली पाच वर्षांपासून कासवगतीने सुरूच आहे. त्यातच महाड तालुक्यातील सव गावाजवळ रस्त्याच्या कामासाठी टाकलेली मातीचे अवकाळी पावसाने चिखलात रुपांतर झाल्याने हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले होते. राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी अजूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


म्हाप्रळ-पंढरपूर यातील वरंधा घाट ते म्हाप्रळ दरम्यान असलेला सुमारे ८२ किमीचा मार्ग महाड तालुक्यातून जातो. या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण कामाची निविदा सन २०१८ रोजी सुमारे २८०.४२ कोटी रुपयांची काढण्यात आली. २०२१ मध्ये दुसरी निविदा काढली. सुमारे २०८.१० कोटी रुपयांची निविदा काढली. निविदा प्रक्रियेतील बदलामुळे प्रत्यक्ष कामाला २०२१ रोजी सुरुवात झाली. तिथपासून आजतागायत या रस्त्याचे काम अद्याप रडत खडत सुरू आहे. सध्या महाड तालुक्यातील शिरगाव ते तुडील या जवळपास नऊ किमी दरम्यान संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे. तुडील गावापासून पुढे साधारण दोन किमी अंतरापर्यंत डांबरीकरण करण्यात आले आहे. पुढे रोहन गावापासून चिंभावे पर्यंत देखील रस्त्याचे काम कमी अधिक प्रमाणात झाले आहे. वराठी गावापासून पुढे गोमेंडीपर्यंत देखील खडी पसरून ठेवण्यात आली आहे. गोमेंडी गावापासून म्हाप्रळपर्यंत एकेरी काँक्रीट काम झाले आहे.



शिरगाव फाट्यापासून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम ठेकेदाराकडून चालू असले तरी सव गावाजवळ रस्त्यावर टाकलेल्या मातीचे अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे रूपांतर चिखलात झाले होते. रस्त्याचे काम करणारा ठेकेदार रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने त्याची काम करणारी यंत्रणा देखील गायब झाल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संताप झाले होते. या रस्त्यावरून चालणारी वाहने विशेषतः मोटरसायकल व कार अनेक ठिकाणी चिखलात रुतून बसल्याचे पाहावयास मिळत होते. तीन वर्षांपासून हे काम अशाच पद्धतीने सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. म्हाप्रळ पंढरपूर या मार्गामध्ये महाड औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडणारे सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीच्या स्थलांतराकरता सुमारे १५० कोटी रुपये अपेक्षित असल्याने महामार्ग विभागाने जलवाहिनीचे स्थलांतर रद्द करून या वीस किलोमीटर अंतरामध्ये डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच अवकाळी पावसामध्ये महाड तालुक्यातल्या पूर्ण अवस्थेत असणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था आहे, तर पावसाळी चार महिन्यांत तालुक्यातली ग्रामीण भागातील या रस्त्यांची अवस्था काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी असेच अनेक प्रवाशांनी या ठिकाणी बोलून दाखवले.

Comments
Add Comment