Saturday, May 10, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

धडाम धुडुम... पाकिस्तानच्या चार विमानतळांवरुन ऐकू आले स्फोटांचे आवाज

धडाम धुडुम... पाकिस्तानच्या चार विमानतळांवरुन ऐकू आले स्फोटांचे आवाज

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या हल्ल्याला काही तासांत भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताने हवाई हल्ला केला. पाकिस्तानच्या चार विमानतळांवरुन सतत मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. स्फोट सुरू होताच पाकिस्तानने देशातील नागरी विमान वाहतूक बंद केल्याचे जाहीर केले. यानंतर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याच्या कारवाया एकदम थंडावल्या. सकाळ उजाडेपर्यंत पाकिस्तानने पुन्हा हवाई हल्ला केल्याचे वृत्त नाही.


याआधी पाकिस्तानने शुक्रवार ९ मे रोजी रात्री जम्मू काश्मीरमध्ये फक्त जम्मू तसेच पंजाब आणि राजस्थानमध्ये अशा एकूण २६ ठिकाणी हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त सीमेपलिकडून पाकिस्तानने नागरी वस्त्यांना आणि सैन्याच्या चौकी - पहाऱ्यांना लक्ष्य करुन गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताचे मर्यादीत नुकसान झाले. भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे अनेक हवाई हल्ले निकामी केले. पण काही हवाई हल्ल्यांमुळे निवडक ठिकाणी घरांची आणि इमारतींची पडझड झाली. काही नागरिक जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.


पाकिस्तानच्या हल्ल्यांना उत्तर म्हणून भारताने हवाई हल्ले केले. तसेच सीमेवर पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली. भारताने सीमेच्या जवळचे अतिरेक्यांचे लाँच पँड तसेच सीमेजवळच्या भागातील ड्रोनचे लाँच पॅड नष्ट केले. यानंतर भारताने इस्लामाबादपासून जेमतेम १० किमी अंतरावर, रावळपिंडी जवळच्या गॅरिसन शहरामध्ये असलेला नूर खान हवाई तळ, चकवालचा मुरिद हवाई तळ आणि पूर्व पंजाब प्रांतातील झांग जिल्ह्यातील रफीकी हवाई तळ यांच्यासह सैन्याच्या वापरात असलेल्या आणखी एका हवाई तळाला लक्ष्य केले. या सर्व विमानतळांवरुन स्फोटांचे मोठे आवाज ऐकू येऊ लागले. स्फोट सुरू होताच पाकिस्तानने देशातील नागरी विमान वाहतूक बंद केल्याचे जाहीर केले. यानंतर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याच्या कारवाया एकदम थंडावल्या. सकाळ उजाडेपर्यंत पाकिस्तानने पुन्हा हवाई हल्ला केल्याचे वृत्त नाही.


पाकिस्तानने भारताच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेटच्या साठ्याला नष्ट करण्यासाठी फतेह क्षेपणास्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने पाकिस्तानची क्षेपणास्त्र निकामी केली. पाकिस्तानचे अनेक ड्रोन, रॉकेट हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने निकामी केले. या व्यतिरिक्त शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढाई दरम्यान भारताने पाकिस्तानची काही लढाऊ विमानं पाडल्याचं वृत्त आहे. या विमानांच्या वैमानिकांनी भारतातच पॅराशूटच्या मदतीने उतरण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस सध्या वैमानिकांचा शोध घेत आहेत. दिसताक्षणी पाकिस्तानच्या वैमानिकांना अटक करा आणि त्यांनी प्रतिहल्ला केल्यास त्यांच्यावर गोळीबार करा, असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.


भारताचे ३२ विमानतळ बंद तर पाकिस्तानची नागरी विमान वाहतूक बंद


भारत - पाकिस्तान लढाई सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने ३२ विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी १४ मे रोजी रात्री १२ पर्यंत बंद केले आहेत. तर पाकिस्तानने पुढील आदेशापर्यंत देशातील नागरी विमान वाहतूक बंद केली आहे. अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भूज, बिकानेर, चंदिगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोड, किशनगड, कुल्लू मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाळा, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सारसावा, शिमला, श्रीनगर, थोइस, उत्तरलाई या विमानतळावरुन भारताने नागरी विमान वाहतूक १४ मे रोजी रात्री १२ पर्यंत बंद केली आहे.

Comments
Add Comment