
वॉशिंग्टन डी. सी. : भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करुन चर्चेची तयारी दाखवली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ या अमेरिकेतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा दावा केला आहे. सलग अनेक तास केलेल्या चर्चेअंती तोडगा काढण्यात यशस्वी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांची नाव आणि धर्म विचारुन हत्या केली. मृतांमध्ये २५ भारतीय आणि एक नेपाळी होता. यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर केले आणि पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात ७ ते १० मे दरम्यान प्रत्येक रात्री संघर्ष सुरू होता. यानंतर १० मे रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी होत असल्याचा दावा केला. शस्त्रसंधी होत असल्याचे पाकिस्तानकडूनही जाहीर करण्यात आले. भारताने शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला असून चर्चा करणार असल्याचे सांगितले.
पाकिस्तानच्या डीजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सने भारताच्या डीजीएमओंना फोन करुन चर्चेसाठी आमंत्रित केले. तसेच जमीन, आकाश आणि पाणी अशा सर्वच ठिकाणी शस्त्रसंधी करत असल्याचे पाकिस्तानच्या डीजीएमओने जाहीर केले. यानंतर पाकिस्तान हल्ला करणार नसेल तर भारत प्रत्युत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही, असे भारताकडून सांगण्यात आले. लष्करी संकेतानुसार पाकिस्तानच्या डीजीएमओकडून आलेले चर्चेचे आमंत्रण भारताच्या डीजीएमओने स्वीकारले आहे. चर्चा कोणत्या मुद्यांवर होणार, कोणत्या अटी - शर्तींच्या आधारे होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. जर डीजीएमओ पातळीवरील चर्चा यशस्वी झाली तर सीमेवर शांतता नांदेल पण चर्चा अयशस्वी झाल्यास काय होणा या प्रश्नाचे उत्तर १२ मे रोजी होणार असलेल्या चर्चेअंती मिळेल.
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "Pakistan's Directors General of Military Operations (DGMO) called Indian DGMO at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air… pic.twitter.com/k3xTTJ9Zxu
— ANI (@ANI) May 10, 2025
सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगितच राहणार ?
सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित राहणार की पुन्हा पूर्ववत केला जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. भारत सरकारने या संदर्भात कोणतीही नवी घोषणा केलेली नाही. यामुळे सध्या तरी कागदोपत्री सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगितच आहे.