Saturday, May 10, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक बंद

भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील एकूण ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक १४ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवत असल्याचे जाहीर केले आहे. या आदेशानुसार अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भूज, बिकानेर, चंदिगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोड, किशनगड, कुल्लू मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाळा, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सारसावा, शिमला, श्रीनगर, थोइस, उत्तरलाई या विमानतळावरुन भारताने नागरी विमान वाहतूक १४ मे रोजी रात्री १२ पर्यंत बंद केली आहे. दिल्ली आणि मुंबई हवाई हद्द विभागात येणारे २५ हवाई मार्ग नागरी विमान वाहतुकीसाठी १५ मे रोजी पहाटे साडेपाचपर्यंत बंद करण्यात आले आहेत. जमिनीपासून अमर्यादित उंचीपर्यंत हे हवाई मार्ग बंद असतील.


भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नागरी विमान वाहतुकीसाठी जारी केलेला बंदी आदेश सर्व नागरी विमान वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना लागू असेल. सुरक्षित विमान प्रवास आणि विमान प्रवाशांच्या तसेच विमान कंपन्यांच्या हितांच्या रक्षणासाठी हा बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे बंधन सर्व नागरी विमान वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांवर लागू असेल. बंदी आदेश तात्पुरता असून परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केले आहे.

Comments
Add Comment