
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि बीसीसीआय चर्चा केली आणि हा निर्णय घेतला. सध्या तणावामुळे सुरक्षा पथकांवर कामाचा ताण आहे. यामुळेच आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे.
TATA IPL 2025 suspended for one week.
More details here 👇👇 | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2025
आतापर्यंत आयपीएलचे ५८ साखळी सामने झाले होते. गुजरात टायटन्स पहिल्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या, पंजाब किंग्स तिसऱ्या, मुंबई इंडियन्स चौथ्या, दिल्ली कॅपिटल्स पाचव्या, कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या, लखनऊ सुपर जायंट्स सातव्या, सनरायझर्स हैदराबाद आठव्या, राजस्थान रॉयल्स नवव्या आणि चेन्नई सुपरकिंग्स दहाव्या स्थानावर आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये ७० साखळी सामने, दोन पात्रता सामने अर्थात क्वालिफायर, एक बाद फेरीचा सामना अर्थात एलिमिनेटर आणि अंतिम सामना अर्थात फायनल असे एकूण ७४ सामने खेळवण्याचे नियोजन होते. यापैकी ५८ वा साखळी सामना सुरू असतानाच धरमशाला येथे ब्लॅकआऊट करण्यात आले. खेळाडूंना सुरक्षितरित्या हॉटेलवर पाठवण्यात आले. प्रेक्षकांनाही स्टेडियम सोडून शांतपणे घरी जाण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतरच आयपीएल २०२५ वर अनिश्चिततेचे सावट घोंगावत होते. अखेर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे ८ मे बुधवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच रद्द करण्यात आला. धमरशालाचे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम रिकामे करण्यात आले. खेळाडूंना धरमशाला येथून दिल्लीला आणण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. बीसीसीआयने खेळाडू आणि सहयोगी स्टाफसाठी वंदे भारत एक्सप्रेसची व्यवस्था केली होती.