
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश दिले आहेत. या सैनिकांना बोलावून देशसेवेत सहभागी करुन घेण्याचे अधिकार केंद्र सरकारने भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना दिले आहेत. सैन्य नियम, १९४८ च्या नियम ३३ अंतर्गत कोणत्याही प्रादेशिक सैन्य अधिकाऱ्याला किंवा जवानाला लष्कराच्या नियमित दलांना मदत करण्यासाठी बोलावण्याचा अधिकार लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना दिले आहेत.
देशात प्रादेशिक सैन्याच्या अर्थात टेरिटोरियल आर्मीच्या ३२ इन्फंट्री बटालियन आहेत. यापैकी १४ बटालियन युद्ध सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बटालियनमधी अधिकारी आणि जवानांना फोन येताच लष्कराच्या नियमित दलांना मदत करण्यासाठी निर्देश दिले जातील त्या सैन्याच्या विभागात कार्यरत व्हायचे आहे. भारतीय लष्करात सदर्न कमांड (दक्षिण कमांड), ईस्टर्न कमांड (पूर्व कमांड), वेस्टर्न कमांड (पश्चिम कमांड), सेंट्रल कमांड (मध्य कमांड), नॉर्दन कमांड (उत्तर कमांड), साऊथ वेस्ट (दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य कमांड), अंदमान आणि निकोबार कमांड, आर्मी ट्रेनिंग कमांड हे प्रमुख विभाग आहेत. प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक नोंदणीकृत सैनिकाला आवश्यक गार्ड कर्तव्ये पार पाडण्यासाठी किंवा नियमित सैन्याला पाठिंबा देण्यासाठी सक्रिय केले जाऊ शकते, असे सरकारी आदेशात नमूद आहे.
पाकिस्तानने गुरुवार ८ मे आणि शुक्रवार ९ मे दरम्यान रात्री भारतात ठिकठिकाणी ड्रोन, विमान, रॉकेट, क्षेपणास्त्र यांच्या मदतीने हवाई हल्ला करण्याचे प्रयत्न केले. या व्यतिरिक्त पाकिस्तान सीमेवरील भारतीय नागरी वस्त्यांना लक्ष्य करुन गोळीबार आणि तोफांचा मारा करत होता. पाकिस्तानच्या हल्ल्याला भरताने चोख उत्तर दिले. यानंतर सरकारने तातडीने प्रादेशिक सैन्याला सज्जतेचे आदेश दिले.
भारताच्या प्रादेशिक सैन्यातील मान्यवर : मानद लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी, कॅप्टन सचिन तेंडुकर, मानद ग्रुप कॅप्टन सचिन रमेश तेंडुलकर, कॅप्टन अनुराग ठाकूर, मेजर अभिनव बिंद्रा, मानद कर्नल कपिल देव, लेफ्टनंट दीप्ती राणा