Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती व्यक्त केली कृतज्ञता


मुंबई : पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत ड्रोन्स पाठवण्याचा प्रयत्न फोल ठरवत भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर देत शौर्याचे दर्शन घडवले. या शौर्यावर देशभरातून आणि विशेषतः बॉलिवूड कलाकारांकडून लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यात येत आहे. श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच बॉलीवूड सेलिब्रिटींनी भारताचे समर्थन करत लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे.


८ व ९ मेच्या रात्री, जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने अनेक ड्रोन्सद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने ५० पेक्षा अधिक पाकिस्तानी ड्रोन्स पाडून हा हल्ला परतवून लावला. यासोबतच संघर्षविरामाचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. या कारवाईस ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. या ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले.




 

या शौर्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, "आपल्या जवानांचा अभिमान वाटतो. जय हिंद!"




 

दाक्षिणात्य अभिनेता वरुण कोनिडेला म्हणाला, "भारतीय लष्कराच्या धैर्याला सलाम! आम्ही तुमच्यासोबत आहोत. जय हिंद!"




 

अभिनेत्री व खासदार कंगना रणावत हिने जम्मूमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई संरक्षण दलाचा व्हिडीओ शेअर करत म्हटले, "जम्मू पुन्हा लक्ष्यावर! परंतु पाकिस्तानचे ड्रोन्स निष्क्रिय करण्यात आले. जय हिंद!''



कॉमेडियन वीर दासने ब्लॅकआउटमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी प्रार्थना करत म्हटले, "अंधारात बसलेल्या माझ्या मित्र-नातलगांना आणि सर्व देशवासीयांना प्रार्थना आणि शुभेच्छा! त्यांच्या संरक्षणासाठी उभ्या असलेल्या लष्कराचे आभार!"


ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांचाही यामध्ये सहभाग होता. जम्मूमधील आपल्या नातलगांनी पाठवलेला ब्लॅकआउटचा व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले, "माझा चुलत भाऊ म्हणतोय — ‘भैय्या, आम्ही भारतात आहोत. आपली सुरक्षा भारतीय लष्कर आणि माता वैष्णोदेवी करत आहेत. चिंता करू नका.’ हे ऐकून छाती अभिमानाने भरून आली."


दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी लिहिले, "पुढची रात्र मोठी असणार आहे. पण भारतीय जवानांचं धैर्य अपार आहे. चला आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहूया!"


भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानकडून आलेल्या ड्रोन हल्ले आणि संघर्षविराम उल्लंघनाला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले असून देशाच्या सार्वभौमत्वासाठी आम्ही सज्ज आहोत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. "कोणत्याही नापाक इराद्यांना कठोर प्रत्युत्तर देण्यात येईल," असा निर्धारही लष्कराने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment